अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यभरात सध्या २९ हजार ७७५ कामे सुरू आहेत. ग्रामपंचायती व विविध यंत्रणास्तरावरील कामांचा यामध्ये समावेश आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तर व यंत्रणास्तरावर कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने शेतरस्ते, अंतर्गत रस्ते, नाला सरळीकरण, सिंचन विहिरी, सिमेंट बांध, ढाळीचे बांध, वृक्षारोपण, वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये, तसेच इतर कामांचा समावेश आहे. मागणी प्राप्त होताच मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी रोहयो अंतर्गत राज्यात एकूण ४ लाख ९० हजार ४७६ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. नियोजनाच्या तुलनेत गेल्या २४ मेअखेर राज्यातील सहा विभागांतर्गत ३३ जिल्ह्यांमध्ये २९ हजार ७७५ रोहयोची कामे सुरू आहेत. यामध्ये ग्रामपंचायतींच्या स्तरावर २४ हजार २४८ आणि विविध यंत्रणास्तरावर ५ हजार ५२७ कामे सुरू असल्याचे शासनाच्या नियोजन व रोहयो विभागामार्फत गत २४ मे अखेरच्या साप्ताहिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
राज्यात २९ हजारांवर रोहयोची कामे सुरू
By admin | Updated: May 30, 2014 03:41 IST