Join us

सोयाबीनने वाढविली कृषी विभागाची चिंता

By admin | Updated: May 7, 2014 03:53 IST

आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने कृषी विभागाची चिंता वाढली आहे.

काळाबाजार होण्याची शक्यता : गुण नियंत्रण विभाग सज्ज नागपूर : आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीने कृषी विभागाची चिंता वाढली आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे विदर्भातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेकांचे उभे पीक वाहून गेले होते, तर काहींच्या सोयाबीनला शेतातच अंकुर फुटले होते. अशा स्थितीत पुढील महिन्यात सुरू होणार्‍या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना पेरणीसाठी सोयाबीन बियाणे उपलब्ध होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी यापूर्वीच यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र कमी होऊ न कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. गतवर्षी नागपूर विभागात सरासरी ४ लाख २२ हजार ५४४ हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड झाली होती. त्यासाठी १ लाख ९५ हजार ४४८ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. शिवाय आगामी खरीप हंगामात सरासरी ३ लाख ७८ हजार ३५० हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड होण्याचा अंदाज वर्तविल्या जात असून, त्यासाठी २ लाख ८३ हजार ४७० क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्यास, व्यापार्‍यांकडून त्याचा काळबाजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु कृषी विभागाचे गुण नियंत्रण अधिकारी अशा व्यापार्‍यांवर आतापासूनच नजर रोखून बसले असल्याची माहिती पुढे आली आहे. (प्रतिनिधी)