अकोला : पश्चिम विदर्भातील जवळपास सर्वच धरणांची जलपातळी खालावली असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळीही घसरली आहे. परिणामी पाणी मिळणे कठीण झाल्याने जवळपास एक लाख हेक्टरवरील फळपिकांवर जलसंकट ओढवले आहे. अनेक ठिकाणी आताच फळझाडे वाळण्यास सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातील आठ हजार हेक्टर क्षेत्र ओलित करणाऱ्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात अवघा २३ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने यावर्षी सिंचनाला पाणी मिळणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. २०१३-१४ साली चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे, जलसाठे ओव्हरफ्लो झाली होती. त्यामुळे शेतकरी निश्चिंत होता; परंतु भूगर्भातील पाणी साठवण क्षमता हवी तेवढी वाढली नव्हती, परिणामी विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे.पावसाचे पाणी वेगाने वाहून गेल्यामुळे जमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नाही. या परिस्थितीची झळ भाजीपाला व फळ बागायतदार शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. यावर्षी पावसाचे सरासरी प्रमाण घसरल्याने पाणीटंचाईत भर पडली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३,१५० हेक्टरवर संत्रा आहे. दुसऱ्या क्रमांकावर २३०० हेक्टर लिंबू असून, केळी २२५० हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५०, चिकू ७५, सीताफळ ७५, आवळा ९० तर आंबा ६२५ हेक्टर आहे. गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांनी फळपिकांचे क्षेत्र वाढविले; परंतु पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान, यंदा हिवाळ््यातच जलपातळी घसरली असून, हिवाळा उशिरा सुरू झाल्याने तापमानातही वाढ होत आहे. परिणामी मागील एक महिन्यात धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने झाले. हिवाळा उशिरा सुरू झाल्याने यावर्षी तापमान वाढण्याची शक्यता असल्याने उन्हाळ््याचे नियोजन करावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. >पश्चिम विदर्भात पावसाचे सातत्य नसल्याने भूगर्भात अपेक्षित पाण्याचे पुनर्भरण झाले नाही. त्यामुळे आतापासूनच पणीटंचाईची तीव्रता दिसत आहे. खारपाणपट्ट्यात काही ठिकाणी कृषी विद्यापीठाने जलसंधारणाचे चांगले काम केले आहे; पण यावर्षी पाऊस नसल्याने कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांनी उन्हाळ््यात सिंचन व्यवस्था करावी.-डॉ. एस.एम. टाले, संचालक, कृषी पद्धती व पर्यावरण केंद्र, डॉ. पंदेकृवि, अकोला
सर्वच धरणांतील जलसाठा अर्ध्यापेक्षा कमी
By admin | Updated: December 11, 2015 23:57 IST