Join us

‘बोटावरची क्रांती’ वाढवेल ‘स्मार्ट’ नागरिकांची संख्या

By admin | Updated: May 7, 2014 04:05 IST

२०१४च्या उत्तरार्धात मात्र देशातच नव्हे तर अख्ख्या जगातच एक अनोखी क्रांती उंबरठ्यावर आहे. या क्रांतीचे माध्यम आहे अर्थातच मोबाईल.

आयटीयूचा अहवाल : विकसनशील देशात स्मार्टफोनधारक सर्वाधिक

नवी दिल्ली : २०१४ च्या मध्यावर भारतात निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळी क्रांती घडणार असल्याचे मानले जात आहे. देशाच्या सारीपाटावरची सारीच गणिते उलटीपालटी होणार असल्याचे भाकीत मांडले जात असले तरी २०१४च्या उत्तरार्धात मात्र देशातच नव्हे तर अख्ख्या जगातच एक अनोखी क्रांती उंबरठ्यावर आहे. या क्रांतीचे माध्यम आहे अर्थातच मोबाईल. अख्ख्या जगाच्या कानाकोपर्‍यात अगदी गोरगरिबांच्या हातातही आता ‘स्मार्टफोन’ दिसू लागल्यामुळे वैश्विक आवाका आता ‘बोटांवर’ आला आहे. संगणकापेक्षाही मोबाईलवरील इंटरनेट जोडण्या झपाट्याने वाढत आहेत. विकसित देशात तर या वेगाचा झपाटा इतका मोठा आहे की येत्या काही वर्षांत मोबाईल इंटरनेटच्या वाढीचा वेग जवळजवळ संपुष्टात येईल (कारण प्रत्येकच मोबाईलधारक इंटरनेटची जोडणी घेईल) असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विकसित देशांमध्ये तर आताच मोबाईल इंटरनेटने ७५ टक्के हिस्सा काबीज केला आहे. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर विकसित देशातील ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक मोबाईलवर इंटरनेट जोडणी आहे. येत्या काही वर्षांत जवळजवळ प्रत्येक हँडसेट ‘व्हर्च्युअल’ होईल असे भाकित तज्ज्ञांनी वर्तवले आहे. मोबाईल इंटरनेटने केवळ तरुणाईच नव्हे, तर वृद्ध, आबालांनाही भूरळ घातली आहे. शेतकर्‍यांपासून तर शास्त्रज्ञांपर्यंत स्मार्टफोनचा वापर दैनंदिन कामासाठी सर्रास सुरू झाला आहे. (वृत्तसंस्था) इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या ३ अब्ज होईल संयुक्त राष्ट्र : जगात इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या २०१४च्या अखेरपर्यंत तीन अब्ज होईल तसेच मोबाईलधारकांची संख्याही वाढून सात अब्जाच्या घरात जाणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. २०१४च्या अखेरपर्यंत जगात ४४ टक्के घरांमध्ये इंटरनेट जोडणी असेल, असे संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय दुरसंचार संघाने (आयटीयू) आपल्या एका अहवालात म्हटले आहे. ४अमेरिकेतही या वर्षअखेरीपर्यंत दर तीन नागरिकांमागे दोन जण नेटच्या माध्यमातून कनेक्टेड असतील. मोबाईलने लॅँडलाईन कनेक्शन्सची गोची केल्याने ही संख्या वेगाने घटते आहे. २००९च्या तुलनेत लॅँडलाईन कनेक्शन्स दहा कोटीने कमी झालेले असतील. तंत्रज्ञानाच्या आविष्काराने अनेक गोष्टी हातांच्या बोटांवर आल्याने अनेक संधी वाट पाहात आहेत. या ‘संधी’ आणखी वाढतील. नव माध्यमांचा योग्य उपयोग करेल तो ‘मालामाल’ होईल, असेही बर्‍याच संशोधनकर्त्यांनी अभ्यासाअंती सांगितले आहे.