मुंबई : शेअर बाजारत सलग तिसर्या दिवशी तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात २२५ कंपन्यांच्या शेअरनी आपल्या ५२ आठवड्यांचा उच्चांकास स्पर्श केला. एसीसी, भेल, बीपीसीएल, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, एचपीसीएल, आयसीआयसीआय बँक, एल एण्ड टी, एनएमडीसी, टाटा मोटर्स व टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्सनी झेप घेतली.
बीएसई सेन्सेक्सने मंगळवारी २३,८७१.२३ अंक या नव्या विक्रमाला गवसणी घातली. एनएसई निफ्टी ७,१०८.७५ अंकाच्या नव्या उचांकावर बंद झाला.
मतदानोत्तर चाचण्यांवरून केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार येणार असल्याचा अदमास घेत बाजाराने मंगळवारी नवा उच्चांक गाठला. बीएसईच्या १२ निर्देशांकात ११ निर्देशांक तेजीसह बंद झाले.
सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज अशा टीसीएस कंपनीच्या बाजारमूल्यात ९३३२ कोटी ७१ लाख रुपयांची वाढ होत ते चार लाख २३ हजार ३२० कोटी २९ लाख रुपयांवर पोहोचले. या तेजीमध्ये फायद्याच्या यादीत क्रमांक पहिला राखण्यात रिलायन्स कंपनीला यश आले आहे. गेल्या आठवड्यातील हाच सिलसिला या आठवड्यात सुरू आहे. उलट या आठवड्यातील तेजी वाढली आहे. विशेषत: भाजपाला सत्ता मिळणार असल्याच्या चर्चेने बाजारात तेजीला उधाण आले आहे. त्याचा परिणाम म्हणून सेन्सेक्स उसळला आहे. त्यामुळे बड्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात हजारो कोटींची भर पडेल, असे तज्ज्ञांना वाटते. (प्रतिनिधी)