Join us  

पोषण अभियान ही लोक चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 5:40 AM

राष्ट्रीय पोषण आहार अभियान आता लोक चळवळ बनली आहे, असे प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केले.

नवी दिल्ली : राष्ट्रीय पोषण आहार अभियान आता लोक चळवळ बनली आहे, असे प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केले. मुले आणि महिलांमधील अल्पपोषण आणि रक्ताल्पता (अ‍ॅनेमिया) तसेच कमी वजनाच्या बाळांच्या जन्माचे प्रमाण कमी करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.राजीव कुमार यांनी सांगितले की, संमिलन आणि वर्तणुकीतील बदल हे या अभियानाचे दोन प्रमुख स्तंभ आहेत. आमच्या हितधारकांनी केलेल्या संघटित प्रयत्नांमुळे देशातील महिला आणि मुलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अभियानाने आता इतकी गती घेतली आहे की, ते आता जन आंदोलनच बनले आहे.पोषण अभियानासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक-थॉन’ कार्यक्रमात राजीव कुमार यांनी म्हटले की, कुपोषणाच्या मुद्यावर बहुआयामी धोरण आखणे गरजेचे आहे. कारण भारतातील ३८ टक्के मुले अजूनही अल्पपोषित आहेत.नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले की,राष्ट्रीय पोषण अभियानासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस-कॉमन अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर (आयसीडीएस-कॅस) अत्यंत उपयुक्त ठरले आहे.हा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सर्वांत मोठा आयटी वापर ठरला आहे. बाळाच्या पहिल्या १ हजार दिवसांत पुरेसे स्तनपान आणि त्यासोबत जास्तीत जास्त पूरक आहार महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे सामान्य आजारांचे वेळेत व्यवस्थापन करणेही या काळात अत्यंत आवश्यक आहे.६ महिने ते २ वर्षे वयाची बाळे पोषणाची भुकेली असतात. या वयाच्या बाळांमधील २५ टक्के अल्पपोषणाचे कारण हगवण हे असते.