- मनोज गडनीस, मुंबई२०१५ च्या वर्षात हिंदोळ्यावर राहिलेल्या भारतीय शेअर बाजाराची वाटचाल २०१६ च्या नव्या वर्षातही आस्तेकदमच असेल; परंतु आगामी दोन ते पाच वर्षांचे उद्दिष्ट राखल्यास आगामी काही महिने गुंतवणुकीसाठी एक संधी म्हणून उत्तम असल्याचे मत शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बाजारातील हालचाल जरी कमी वेगाने होत असली तरी त्यामुळे हताश होण्याचे कारण नसल्याचेही मत व्यक्त होतआहे. २०१६ च्या वर्षामध्ये गुंतवणूकदारांचे प्रामुख्याने लक्ष हे २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प आणि आर्थिक सुधारणा यांच्याकडे आहे. अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा रखडल्या आहेत, त्या सुधारणा तूर्तास मार्गी लागण्याची शक्यता कमीआहे. त्यात आता बाजाराची दिशा आगामी अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच त्याच अनुषंगाने २०१६ मधला शेअर बाजाराचा प्रवास निश्चित होईल, असे मत शेअर बाजार विश्लेषण अनिल मेहता यांनी व्यक्त केले. २०११ ते सप्टेंबर २०१३ अशा अडीच वर्षांच्या कालावधीनंतर सप्टेंबर २०१३ मध्ये भारतीय शेअर बाजारात तेजीने प्रवेश केला आणि पुढील सव्वा वर्ष तेजीचा चौफेर संचार होता. त्यातच मे २०१४ मध्ये स्थिर सरकार आल्यानंतर आर्थिक सुधारणा वेग घेतील या आशेने तेजीचा आणखी प्रसार झाला; मात्र आश्वासन दिलेल्या सुधारणांना खीळ बसल्याने शेअर बाजारात पुन्हा शैथिल्य आले आणि २०१५ च्या वर्षात भारतीय शेअर बाजारात पुन्हा दोलायमान अशी स्थितीराहिली. २०१४ मध्ये अनेक कंपन्यांच्या समभागांना मोठी मागणी राहिली. बाजारात कार्यरत कंपन्यांपैकी ७० टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्यांनी ५२ आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला; मात्र आर्थिक सुधारणांच्या मुद्यावर सरकार लडखडल्यामुळे, चीनमधील मंदी, जागतिक अर्थकारणातील मंदीचे संकेत आणि २०१५ मध्ये अमेरिकी फेडरलने वाढविलेले पाव टक्का दर यामुळे शेअर बाजाराचा ट्रेंड हा तेजी कमी आणि मंदी जास्त अशा पद्धतीचा राहिला; मात्र या परिस्थितीमुळे अनेक चांगल्या कंपन्यांचे समभाग हे एक वर्षाच्या नीचांकी किमतीच्या पातळीवर आले.बाजार विश्लेषण निरंजन रुंगठा यांच्या मते, दोन ते पाच वर्षांचे लक्ष्य निर्धारित करून या समभागांची खरेदी केल्यास ती फायदेशीर ठरूशकते.
पुढील वर्षी बाजाराची वाटचाल आस्ते कदम
By admin | Updated: December 30, 2015 01:45 IST