नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्यांकडून दीर्घ काळापासून उच्च गतीच्या मोबाईल इंटरनेट सेवा देण्याचा दावा करीत आल्या आहेत. मात्र, आता २३ आॅगस्टपर्यंत ग्राहकांना कमीत कमी ८० टक्के वेळा दाव्यानुसार किमान डाऊनलोड गतीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. २जी व ३जी सेवांसाठी हा नियम लागू आहे.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने वायरलेस डेटा सेवा नियमनासाठी गुणवत्ता मानकांमध्ये सुधारणा केली आहे. यानुसार, प्रत्येक सेवा दात्यास मोबाईल व डोंगल दोन्ही पद्धतीने दिल्या जाणाऱ्या इंटरनेट योजनांमध्ये उपलब्ध किमान डाऊनलोड स्पीडबाबत ग्राहकांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे लागणार आहे. मे २०१४ च्या अखेरीपर्यंत देशात ५ कोटी ग्राहक मोबाईल आणि डोंगलद्वारे वायरलेस इंटरनेट सुविधा वापर होते.दूरसंचार कंपन्यांना ट्रायला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याद्वारे सर्वाधिक तीव्र गतीच्या ३ जी सेवेमध्ये किमान डाऊनलोड स्पीड ३९९ केबीपीएस ते २.४८ एमबीपीएस यादरम्यान आहे.ट्रायने यापूर्वी ३ जी आणि सीडीएमए सेवांसाठी ९५ टक्के यशस्वीता दरासह किमान डाऊनलोड गती एक एमबी प्रतिसेकंद असली पाहिजे, असे निर्देश दिले होते. २ जी जीएसएम आणि सीडीएमएबाबत हे प्रमाण किमान ५६ किलोबाईट प्रतिसेकंद असावी लागेल. मात्र, नव्या नियमांत किमान स्पीडचा उल्लेख नाही.ट्रायने जारी केलेल्या अधिसूचनेत ब्रॉडबँडची किमान गती ५१२ किलोबाईट प्रतिसेकंद असणे आवश्यक आहे. ३ जी सुविधा सामन्यत: ब्राडबँड वायरलेस सेवा म्हणून ओळखली जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोबाईल इंटरनेट होणार सुपरफास्ट
By admin | Updated: July 28, 2014 03:04 IST