Join us  

दोन आठवड्यांच्या घसरणीनंतर बाजारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:42 AM

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक वृद्धीबाबत व्यक्त केलेल्या भीतीनंतरही जगभरातील शेअर बाजारांमध्ये होत असलेली वाढ, सेवाक्षेत्रामध्ये झालेली सुधारणा आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली मोठी गुंतवणूक, यामुळे शेअर बाजार दोन सप्ताहांनंतर वाढीव पातळीवर बंद झाला.

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने आर्थिक वृद्धीबाबत व्यक्त केलेल्या भीतीनंतरही जगभरातील शेअर बाजारांमध्ये होत असलेली वाढ, सेवाक्षेत्रामध्ये झालेली सुधारणा आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली मोठी गुंतवणूक, यामुळे शेअर बाजार दोन सप्ताहांनंतर वाढीव पातळीवर बंद झाला. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीमध्ये मिळालेल्या अनेक सवलतींचे प्रतिबिंब बाजारात आगामी सप्ताहात पडलेले दिसून येईल.दोन आठवडे सातत्याने घसरत असलेल्या बाजाराने गतसप्ताहात उभारी घेतली. या सप्ताहात बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३२०१६.५२ आणि ३१०८१.८३ अंशांदरम्यान वर-खाली हेलकावत अखेरीस ३१८१४.२२ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत तो ५३०.५० अंश म्हणजेच ०.७ टक्क्यांनी वाढला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सप्ताहामध्ये १५३ अंश म्हणजेच ०.९ टक्क्यांनी वाढून ९९७९.७० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे क्षेत्रीय निर्देशांक अनुक्रमे २३०.२६ आणि ३६८.७४ अंशांनी वाढून बंद झाले.गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी आपली विक्री कायम राखली आहे. सप्ताहात त्यांनी २,६६८ कोटी रुपयांची विक्री केली. मात्र, देशांतर्गत गुंतवणुकदारांनी बाजारात चांगली गुंतवणूक केली. त्यामुळे बाजारामध्ये चांगली वाढ पाहावयास मिळाली.भारतीय रिझर्व्ह बॅँकेने आपल्या द्वैमासिक आढाव्यामध्ये व्याज दर कायम राखले असले, तरी चलनवाढीची भीती वर्तविली आहे. त्याचप्रमाणे, देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, देशाच्या सेवा क्षेत्रामध्ये झालेली वाढ आणि जगभरातील शेअर बाजारांमधील अनुकूल वातावरण, यामुळे याकडे गुंतवणूकदारांनी फारसे लक्ष दिले नाही.जीएसटी कौन्सिलने दिलेल्या विविध सवलतींमुळे बाजारावर जो प्रभाव पडणार आहे, त्याचे प्रतिबिंब आगामी सप्ताहात बाजारात दिसेल.आयपीओद्वारे उभारले ३२ हजार कोटी रुपये -विविध आस्थापनांनी या वर्षामध्ये प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ)द्वारे सुमारे ३२ हजार कोटी रुपये उभारले असून, चालू वर्षामध्ये हा आकडा ५० हजार कोटींपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास तो एक विक्रम ठरू शकेल.सन २०१७ मध्ये आतापर्यंत सुमारे २५ आस्थापनांनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून, भांडवली बाजारातून ३१,९९६ कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सुमारे १० आस्थापना प्रारंभिक समभाग विक्रीसाठी उतरणार असून, त्यामधून २५ हजार कोटी रुपये उभारले जाण्याची शक्यता आहे.या वर्षी भांडवल उभारलेल्या २४ आस्थापनांपैकी १७ आस्थापनांच्या समभागांची नोंदणी शेअर बाजारामध्ये प्रीमियमने झाली आहे. नंदन एक्झीम या आस्थापनेची नोंदणी ही सर्वाधिक १४० टक्क्यांनी अधिक झाली आहे.

टॅग्स :निर्देशांक