भोपाळ : शेतकर्यांच्या हितासाठी राष्ट्रीय पीक विमा योजना नवी व्यवस्था होईपर्यंत कायम ठेवण्यात यावी, अशी विनंती मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. उज्जैन येथे २०१६ मध्ये भरणार्या सिंहस्थ मेळ्यासाठी केंद्राने ३५०० कोटींचे अनुदान द्यावे, अशी मागणीही चौहान यांनी केली आहे. या पूर्वीच्या केंद्र सरकारने राज्यांशी विचारविमर्श न करताच पीक विमा योजना बंद केली होती. मध्य प्रदेश आणि गुजरात सरकारने त्यावर आक्षेप घेतल्यानंतर, केंद्र सरकारने या योजनेला मागील रबी पिकांसाठी मुदतवाढ दिली होती; परंतु रबी पिकानंतर पुन्हा ही योजना बंद केली, असे चौहान यांनी या पत्रात नमूद केले आहे. या योजनेऐवजी केंद्राने पीक विमा कार्यक्रम लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता; परंतु या कार्यक्रमामुळे शेतकरी आणि राज्य सरकारवरील वित्तीय बोजा वाढेल, असे दिसून आले. याची अंमलबजावणी व्यावहारिक नाही. कारण प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळी निविदा आमंत्रित करावी लागेल आणि जिल्हानिहाय प्रीमियर दर ठरवावे लागतील, असेही चौहान यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. (वृत्तसंस्था)
राष्ट्रीय पीक विमा योजना कायम ठेवा!
By admin | Updated: June 2, 2014 06:30 IST