मुंबई : निवडणुकीचा कौल स्थिर सरकारच्या पारड्यात पडल्यानंतर त्याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटण्यास सुरुवात झालेली असतानाच आता वित्तीय संस्थांपाठोपाठ सामान्य गुंतवणूकदारांची पावलेही शेअर बाजारात पडण्यास सुरुवात झाली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. अर्थात, सामान्य गुंतवणूकदारांनी थेट शेअर बाजाराची पायरी न चढता याकरिता म्युच्युअल फंडाला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीचा शेवटचा टप्पा आटोपल्यानंतर आणि विशेषत: एक्झिट पोलने स्थिर सरकारचे भाकीत वर्तविल्यानंतर साधारणपणे वीस दिवसांच्या कालावधीत ५ कोटी ८६ गुंतवणूकदारांनी नव्याने व्यवहार सुरू केले आहेत. विशेष म्हणजे, म्युच्युअल फंडातील अन्य प्रकारच्या घटकांना पसंती देण्याऐवजी ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी इक्विटी फंडाला पसंती दिली आहे. एकूण गुंतवणूकदारांपैकी ३ कोटी ८६ लाख गुंतवणूकदारांनी इक्विटी फंडाला पसंती दिली आहे. २००७ नंतर प्रथमच एवढ्या छोट्या कालावधीमध्ये १२ टक्क्यांची उच्चांकी वाढ नोंदविली गेली आहे. सामान्य गुंतवणूकदारांची गुंतवणुकीसाठी ज्या ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ला पसंती मिळते, त्यामध्येही सुमारे २८ टक्के वाढ नोंदली गेली आहे. शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी ही जशी विविध कंपन्यांचे भांडवली मूल्य श्रीमंत करण्यात परावर्तित झाली आहे, तशीच म्युच्युअल फंडांचे मूल्य वाढविण्यातही प्रतिबिंबित झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात एकूण ३८०० कोटी रुपयांची नवी गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत या नव्या गुंतवणुकीने ५४२७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. सामान्य गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्थांसोबतच हाय नेटवर्थ इंडिव्ह्युजल्स (एचएनआय)ने देखील म्युच्युअल फंडाला मोठी पसंती दिल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर २०१३ पासून आतापर्यंत एचएनआयने ५३, ६९८ कोटी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. (प्रतिनिधी)
गुंतवणूकदारांचा मोर्चा पुन्हा म्युच्युअल फंडाकडे!
By admin | Updated: May 30, 2014 03:43 IST