नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराने आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये सोने व चांदीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. गेल्या आर्थिक वर्षादरम्यान बेंचमार्क सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना २५ टक्क्यांचा उत्तम परतावा दिला व विशेषत: विदेशी निधीच्या प्रवाहाने शेअर बाजाराची कामगिरी उजवी ठरली. याउलट सोन्यामध्ये ९.३ टक्क्यांची आणि चांदीच्या भावात १४.२८ टक्क्यांची घट झाली.चार मार्च रोजी सेन्सेक्स ३०,०२४.७४ अंक अशा विक्रमी पातळीवर पोहोचला होता. आर्थिक वर्षादरम्यान सेन्सेक्स ५,५७१.२२ अंक (२४.८८ टक्के) वाढून २७,९५७ अंकावर गेला होता. ३१ मार्च २०१४ रोजी तो २२,३८६.२७ अंक होता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार देशांतर्गत शेअर बाजाराच्या प्रभावी कामगिरीमुळे सोने व चांदीच्या किमतीत घट झाली. पर्यायाने सुरक्षित गुंतवणूक म्हणून समजल्या जाणाऱ्या सोन्याऐवजी गुंतवणूकदारांनी शेअरसारख्या जोखमीच्या बाजाराला पसंती दिली. रेलिगेअर सिक्युरिटीजचे अध्यक्ष (किरकोळ वितरण) जयंत मांगलिक म्हणाले की, २०१४-२०१५ मधील उत्तम कामगिरीनंतर भागीदारांना निश्चितपणे आव्हानात्मक ठरणाऱ्या नव्या आर्थिक वर्षासाठी तयार राहिले पाहिजे. ३१ मार्च २०१४ रोजी सोन्याचा भाव २९,३०० रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तोच भाव ३१ मार्च २०१५ रोजी २६,५७५ रुपये होता. याच प्रमाणे चांदीचा भावही ४३,४०० रुपये किलोवरून घटून ३७,२०० रुपये झाला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी २०१४-१५ मध्ये भारतीय शेअर बाजारात २.७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
शेअर बाजारापुढे सोने-चांदी फिके
By admin | Updated: April 3, 2015 00:18 IST