Join us

अर्थमंत्र्यांनी सुरू केले अर्थसंकल्पावर काम

By admin | Updated: May 28, 2014 03:38 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारताच अर्थसंकल्पाच्या तयारीचे काम सुरू केले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारताच अर्थसंकल्पाच्या तयारीचे काम सुरू केले आहे. आज पहिल्या दिवसापासून त्यांनी कामकाज सुरू केले आहे. अधिकार्‍यांनी त्यांना विविध बाबींची माहिती दिली. अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अधिकार्‍यांना सूचना दिल्या. मंत्रालयाच्या विविध विभागांचे कामकाज कसे चालते याची माहितीही अधिकार्‍यांनी त्यांना दिली. अधिकार्‍यांनी एक पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन तयार केले असून, त्याद्वारे अर्थमंत्र्यांना विविध बाबींची माहिती देण्यात आली. अर्थसंकल्पाबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहितीही अधिकार्‍यांनी दिली. अंतरिम अर्थसंकल्पात सुचविण्यात आलेले कर संकलनाचे उद्दिष्ट नव्याने निर्धारित करावयास हवे, असे मत काही अधिकार्‍यांनी व्यक्त केले. यामुळे आर्थिक त्रुटीवर परिणाम होऊ शकतो, ही बाबही निदर्शनास आणण्यात आली असून, अर्थमंत्र्यांच्या निर्देशांनुसार याबाबत तयारी केली जाणार असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले. यंदाचा अर्थसंकल्प हा जुलै महिन्यात मांडला जाण्याची अपेक्षा असल्याने अर्थमंत्र्यांना सर्वप्रथम याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. चलनवाढ, आर्थिक तूट, पतधोरण यासह औद्योगिक धोरणाकडे अर्थमंत्र्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये चिदंबरम यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात दिलेल्या सवलतींबाबत केंद्रीय महसूल मंत्रालय अर्थमंत्रालयाच्या निर्देशांची वाट बघत आहेत. या तरतुदी ३० जूननंतर आपोआपच गैरलागू होणार आहेत. त्या चालू ठेवावयाच्या असल्यास त्यांचा समावेश अर्थसंकल्पात करावा लागणार आहे. याशिवाय कर महसुलाचे उद्दिष्ट आणि जीएसटीबाबत महसूल विभाग अर्थमंत्र्यांच्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)