अल-निनोचा परिणाम : वेळीच उपाययोजना करण्याची गरज
नवी दिल्ली : ज्याप्रमाणे कांद्याने ग्राहकांच्या डोल्यात पाणी आणले तसाच काहीसा प्रकार डाळींच्या बाबतीतही घडण्याची भीती व्यक्त होत आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे भारतात पाऊस कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असताना त्यामुळे आगामी वर्षात डाळींचे उत्पादन कमी होण्याची भीती वर्तविली जात आहे. हा धोका लक्षात घेऊन सरकारने याबाबत वेळीच उपाययोजना केल्यास नागरिकांना फारसा त्रास सहन करावा लागणार नाही, असे मत व्यक्त होत आहे. येत्या पावसाळ्यात भारतामधील मान्सूनवर अल-निनो प्रवाहाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे भारतातील पावसाचे प्रमाण कमी होऊन डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असोसिएटेड चेंबर्स आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री आॅफ इंडिया(असोचेम)ने आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊ लागल्याने डाळींच्या भावात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची भीती या अहवालात व्यक्त केली गेली आहे. देशातील सहा राज्यांमध्ये डाळींच्या उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के उत्पादन होते. या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने डाळींच्या उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत आपली देशांतर्गत मागणी आपल्या बळावर पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आयातीवर अवलंबून रहावे लागत असते. कॅनडा, म्यानमार,आॅस्ट्रेलिया आणि अमेरिका हे जगातील डाळींचे प्रमुख निर्यातदार आहेत. त्यांच्याकडील मागरी आणि पुरवठ्याच्या प्रमाणानुसार डाळींचे भाव निश्चित होत असतात. त्यामुळे या भावांवर भारताचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे या अहवालात स्पष्य केले गेले आहे. सध्या देशामध्ये डाळींचे उत्पादन १८.६० दशलक्ष मेट्रीक टन एवढे होत आहे, तर मागरी २२ दशलक्ष मेट्रीक टन आहे. मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी सरकारने आताच योग्य ते उपाय योजल्यास आगामी काळात डाळींच्या भाववाढीने ग्राहकांचे डोळे पांढरे होणार नाहीत, असे मतही व्यक्त केले गेले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) उत्पादन वाढत असले तरीही पुरवठा मात्र कमी ४मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्टÑ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमधून देशातील एकूण डाळींच्या उत्पादनापैकी ७७ टक्के उत्पादन. ४गुजरात, छत्तीसगढ, बिहार, ओरिसा आणि झारखंड या राज्यांमधून सुमारे २३ टक्के उत्पादन. ४जगातील डाळींच्या एकूण उत्पादनापैकी भारताचा वाटा सुमारे २४ टक्के आहे. ४ सन २०१६पर्यंत भारत २१ दशलक्ष मेट्रीक टन डाळींचे उत्पादन करण्याची शक्यता आहे. मात्र याच काळात मागणी २३ दशलक्ष मेट्रीक टनांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ४गेली तीन वर्षे भारतामधील डाळींच्या उत्पादनामध्ये वाढ होत असली तरी मागणीपेक्षा पुरवठा कमी होत आहे.