Join us

पीक विमा काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला !

By admin | Updated: July 23, 2015 23:58 IST

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत ९० टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; परंतु पावसाची अनियमितता बघता

अकोला : पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत ९० टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; परंतु पावसाची अनियमितता बघता शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यावर जोर दिला आहे. पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलैपर्यंतच असल्याने बँकांमध्ये गर्दी वाढली आहे. दरम्यान, पीक विम्यापोटी आलेले मागील वर्षाचे १४२.२ कोटी शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.यंदा पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांना पीक विम्याची ४२१ कोटी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. यात हवामानावर आधारित पीक विम्याचे ७६.४० कोटी मिळाले आहेत; पण रक्कम मिळण्यास होणाऱ्या दिरंगाईमुळे आतापर्यंत केवळ २७९.०६ कोटी रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली असून, १४२.०२ कोटी रुपये मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरी २३३ मि.मी. एवढाच पाऊस झाल्याने पुढे पाऊस येईल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे.