Join us  

इलेक्ट्रिक वाहन योजना चीनच्याच फायद्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2017 1:42 AM

भारताने याच महिन्यात जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन योजनेचा चिनी कार उत्पादक कंपन्यांनाच लाभ होणार असून, त्यामुळे भारतीय कार उत्पादक कंपन्या चिंतेत पडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताने याच महिन्यात जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन योजनेचा चिनी कार उत्पादक कंपन्यांनाच लाभ होणार असून, त्यामुळे भारतीय कार उत्पादक कंपन्या चिंतेत पडल्या आहेत. भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांनी आपले सारे लक्ष हायब्रीड वाहने बनविण्यावर केंद्रित केले आहे. चीनमध्ये मात्र इलेक्ट्रिक वाहनांवर मोठे संशोधन सुरू आहे. त्यामुळे त्यांना भारताच्या योजनेचा लाभ होईल.भारताने २0३२ पर्यंत सर्व वाहने इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. निति आयोगाच्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक वाहनांवर कमी कर आणि त्यासाठीच्या कर्जावर कमी व्याज लावण्याची शिफारस आहे. याशिवाय पेट्रोल-डिझेलच्या वाहनांच्या विक्रीवर बंधने घालण्यात येणार आहेत. १ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीमध्ये हायब्रीड वाहनांवर जास्त कर लावण्यात येणार आहे. त्यामुळे मारुती सुझुकी आणि टोयोटा मोटर्स यासारख्या कंपन्या नाराज झाल्या आहेत.चीनमधील बीवायडी आणि साईक यासारख्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक केली आहे. भारतीय धोरणाचा या कंपन्यांना मोठा लाभ होईल. चीनमधील सर्वांत मोठी वाहन उत्पादक कंपनी ‘साईक’शी संबंधित सूत्रांनी सांगितले की, भारताकडून इलेक्ट्रिक वाहनांना दिले जात असलेले प्रोत्साहन आमच्यासाठी मोठी संधी आहे. नवागतांसाठी अत्याधुनिक, नावीन्यपूर्ण ब्रँड इमेज उभी करण्याची संधी त्यातून मिळेल.