Join us

परिवहनचा गाडा पुन्हा गडगडला

By admin | Updated: June 20, 2014 22:05 IST

ठाणे परिवहन सेवेचा गाडा पुन्हा एकदा गडगडला असल्याची बाब समोर आली आहे.

अजित मांडके। ठाणे परिवहन सेवेचा गाडा पुन्हा एकदा गडगडला असल्याची बाब समोर आली आहे. परिवहनला वालीच नसल्याने सध्या त्यांचा कारभार रामभरोसे सुरु असून प्रवासी संख्या ५० हजाराने घटली आहे. विशेष म्हणजे रस्त्यांवर धावणार्‍या बसेसची संख्या आणखीनच रोडावली असून आजच्या घडीला केवळ १३० ते १३५ च्या आसपास बसेस रस्त्यावर धावत असून उत्पन्नसुध्दा सुमारे तीन लाखांनी कमी झाले आहे. विशेष म्हणजे बसेस दुरुस्तीसाठी निधी नसल्याने आगारात १७५ बसेस धुळ खात पडून आहेत.ठाणे परिवहन सेवेचा डोलारा कोलमडल्याने नुकतीच वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परिवहन सेवा बेस्टमध्ये विलीन करा अशी मागणी लावून धरली आहे. त्यानुसार परिवहनच्या सध्याच्या कारभाराचा आढावा घेतला असता अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी परिवहनची दोर हाती घेतल्यानंतर परिवहनच्या ताफ्यातून २१० च्या आसपास बसेस रस्त्यावर उतरल्या होत्या. तसेच वाढत्या डिझेल आणि सीएनजीच्या दरामुळे परिवहनने तिकीट दरवाढ सुध्दा केली होती. ही दरवाढ करतांना उत्पन्नात वाढ होईल असा कयास लावण्यात आला होता. तसेच बसेस दुरुस्तीची मोहीम सुध्दा हाती घेण्यात आली. त्यानुसार परिवहनचे उत्पन्न वाढले. परिवहन मधून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या ही दिवासाला अडीच लाखांच्या घरात गेली. तसेच उत्पन्न सुध्दा २३ लाखांपर्यंत पोहचले होते. परंतु आता पुन्हा परिवहनची गाडी रुळावरुन घसरली असून परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ३१३ बसेस असल्या तरी प्रत्यक्षात वागळे आगारातून १०० च्या आसपास आणि कळवा आगारातून ३० ते ३५ बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळेच याचा परिणाम परिवहनच्या अनेक मार्गांवर झाला आहे. घोडबंदर, पवार नगर, पोखरण, बाळकुम, कोलशेत, मनोरमा नगर, कळवा, खारेगाव आदी मार्गांवरील बसेसची संख्या रोडावली असून त्यांना इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागत आहे. याचाच परिणाम म्हणून परिवहन मधून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या अडीच लाखांवरुन २ लाखांवर आली आहे. तसेच उत्पन्न सुध्दा २३ लाखांवरुन १८ ते १९ लाखांवर आले आहे.विशेष म्हणजे मागील दोन वर्षापासून वागळे आगारात परिवहनच्या १०० बसेस दुरुस्ती अभावी धुळखात पडून आहेत. त्यात आता आणखी सुमारे ७५ बसेसची भर पडली असून आता १७५ च्या आसपास बसेस दुरुस्तीसाठी पडून आहेत. या बसेस दुरुस्तीसाठी निधीच नसल्याचे कारण परिवहन प्रशासनाने पुढे केले आहे. दुरुस्तीसाठी निधी पुढे केला तर इतर महत्वांच्या ठिकाणी वापरता येणार नसल्याचे परिवहनचे म्हणने आहे. * परिवहन समिती बरखास्त होऊन तीन ते चार महिन्यांचा काळ लोटला तरीसुध्दा अद्यापही ही समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे परिवहनच्या सुधारणेसाठी करण्यात येणारे पर्याय सुध्दा आता प्रशासनाला राबवता येत नाहीत.* शिवाय परिवहनच्या ताफ्यात १० मिनी बसेस दाखल होणार होत्या. या बसेसच्या मार्गातील बहुतेक अडथळे दुरु झाले असतांना सुध्दा अद्यापही या बसेस परिवहनमध्ये दाखल होऊ शकलेल्या नाहीत.