मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स चार सत्रांनंतर प्रथमच खाली आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना खातेवाटप केल्यानंतर ऊर्जा, तेल आणि गॅस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नफावसुली झाली. त्यामुळे बाजारात घसरण झाली, असे जाणकारांचे मत आहे. मागील तीन सत्रांमध्ये ४१९ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स उच्चांकी पातळीवर पोहोचला होता; परंतु चौथ्या सत्रात गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात नफावसुली सुरू झाल्याने बाजार १६७.३७ अंकांनी कोसळून २४,५४९.५१ अंकावर बंद झाला. सत्रादरम्यान बाजार २४,४२२ ते २४,७७७ दरम्यान होता. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ कंपन्यांचे शेअर्स घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीज, गेल, एसबीआय, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, मारुती व महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स नुकसानीसह बंद झाले. सोमवारी बाजार २४,७१६ या उच्चांकावर बंद झाला होता. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीसुद्धा ४१.०५ अंकांनी किंवा ०.५६ टक्क्याने कोसळून ७,३१८ अंकावर बंद झाला. गुरुवारी होणार्या डेरेव्हिटिव्ह निपटार्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सतर्कतेचा कल ठेवला आहे. मे महिन्यात बाजारात १०.२५ टक्क्यांची तेजी आली. दिल्लीच्या एका शेअर ब्रोकर्सने सांगितले की, मंगळवारी बाजार घसरणे अपेक्षित होते. कारण, नवे सरकार स्थापन झाल्याने बाजाराला फायदा होणार होता. तो फायदा गुंतवणूकदारांना झाला. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी ८४.१३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. (प्रतिनिधी)
बीएसई सेन्सेक्सची उच्चांकावरून १६७ अंकांनी घसरण
By admin | Updated: May 28, 2014 03:43 IST