लखनौ : काचेपासून मणी तयार करण्याच्या पुरातन हस्तकलेचा ‘भौगोलिक मानचिन्ह’ प्रमाणपत्र प्रदान करून बहुमान करण्यात येणार आहे. जिओग्राफीकल इंडिकेशन रजिस्ट्री आॅफ इंडियाने ही हस्तकला टिकविण्यासाठी ‘जीआय’ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या बहुमानामुळे या क्षेत्रातील हजारो कारागिरांना पाठबळ मिळेल.बनारस मणी या हस्तकलेसाठी जीआय नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा अर्ज मंजूर करण्यात आला असून राजपत्रित अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे, असे ट्रेडमार्कस् अँड जिओग्राफीकल रजिस्ट्रेशनचे असिस्टंट रजिस्ट्रार सी.जी. नायडू यांनी सांगितले. बनारस मोती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गुप्ता म्हणाले की, यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. संघटना, निर्यात संवर्धन आयुक्त आणि लघु उद्योग विभागाचे प्रयत्न लवकरच फळाला येतील. अनेकांनी नव-नवीन कल्पनांच्या आधारे नव-आविष्कार घडवीत ५० हजारांहून अधिक प्रकारचे विविध आणि आकर्षक काचेचे मोती विकसित करण्यासाठी मेहनत घेतली. मिर्झापूर, सोनभद्र आणि वाराणसीत जवळपास १० हजार लोक या क्षेत्रात असून दहा वर्षांपूर्वी ९० टक्के माल निर्यात होत होता, असे गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता यांचे वडील कन्हैया लाला यांनी ही कला बनारस हिंदू विद्यापीठातून १९३८ मध्ये एका झेक जोडप्याकडून अवगत केली. पं. मदन मोहन मालवीय यांनी या जोडप्याला निमंत्रित केले होते.
‘बनारस मोती’ला ‘जीआय’चे कोंदण
By admin | Updated: January 9, 2015 23:45 IST