Join us  

सर्वच क्षेत्रांना ग्रासले मंदीने, रोजगारनिर्मिती ठप्प; लोकांच्या जात आहेत नोक-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 3:58 AM

अर्थव्यवस्थेतील वस्त्रोद्योग ते भांडवली वस्तू, बँकिंग ते आयटी आणि स्टार्ट-अप ते ऊर्जा, अशा सर्वच क्षेत्रांना मंदीने ग्रासले असून, नोकर कपातीमुळे लोक मोठ्या प्रमाणात बेरोजगार होत आहेत

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील वस्त्रोद्योग ते भांडवली वस्तू, बँकिंग ते आयटी आणि स्टार्ट-अप ते ऊर्जा, अशा सर्वच क्षेत्रांना मंदीने ग्रासले असून, नोकर कपातीमुळे लोक मोठ्या प्रमाणात बेरोजगार होत आहेत. नवीन रोजगार निर्मितीही ठप्प झाली आहे.वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कापड उद्योगात गेल्या तीन वित्त वर्षांत ६७ कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे १७,६00 कामगार बेरोजगार झाले.याशिवाय भांडवली वस्तू बनविणारी मोठी कंपनी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने ३१ मार्चला संपलेल्या वित्त वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीत १४ हजार कर्मचाºयांना काढून टाकले. चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आयटी क्षेत्रातील पहिल्या पाच कंपन्यांपैकी तीन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. टीसीएसने १,४१४ लोकांना, इन्फोसिसने १,८११ लोकांना, तर टेक महिंद्राने १,७१३ लोकांना घरी पाठवले.एचडीएफसी बँकेची कर्मचारी संख्या ६,0९६ ने कमी झाली आहे. इतर बँकांनीही मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली आहे. ऊर्जा क्षेत्रात विंड गीअर पुरवठादार कंपनी सुझलॉन एनर्जी आणि टर्बाइन मेकर रेगेन पॉवरटेक यांनी सहा महिन्यांत १,५00 कर्मचाºयांची कपात केली आहे.

सूत्रांनी सांगितले की, खासगी गुंतवणूक, खासगी उपभोग आणि निर्यात यांचे प्रमाण घटल्यामुळे अर्थव्यवस्था मंदीत आली आहे. वस्त्रोद्योगातील निर्यात मोठ्या प्रमाणात घसरली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचा फटका छोट्या व्यवसायांना बसला आहे.एल अँड टीचे मुख्य वित्त अधिकारी आर. शंकर रमन यांनी सांगितले की, कंपनीने आकार कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोकर कपात करावी लागली आहे.२०१६ मध्ये २१२ स्टार्टअप कंपन्या बंद पडल्या. आदल्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 50% अधिक.एका अधिकाºयाने सांगितले की, बंद पडलेले बहुतांश उद्योग पॉवरलूम क्षेत्रातील आहेत. विकेंद्रित क्षेत्रातील आकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा आकडा आणखी मोठा असू शकतो.