Join us  

खाती उघडली; पण बँक शाखाच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:50 AM

केंद्र सरकारने जनधन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांची बँकांत खाती उघडली असली तरी ग्रामीण भागांत बँक शाखा आणि एटीएम केंद्र नसल्याने आपलेच पैसे काढण्यासाठी लोकांना दूरच्या गावांची पायपीट करावी लागत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जनधन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांची बँकांत खाती उघडली असली तरी ग्रामीण भागांत बँक शाखा आणि एटीएम केंद्र नसल्याने आपलेच पैसे काढण्यासाठी लोकांना दूरच्या गावांची पायपीट करावी लागत आहे. बँक शाखांत अथवा एटीएम केंद्रांवर अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे ग्रामीण मतदारांत मोदी सरकारबाबत असंतोष आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.मोदी यांनी २0१४मध्ये सत्ता येताच जनधन योजना सुरू केली. या योजनेमुळे ३१ कोटी लोक नव्याने बँकिंग व्यवस्थेत आले. बहुतांश कुटुंबांची बँकांत खाती उघडली गेल्यामुळे अनेक कल्याणकारी योजना बँक खात्याशी जोडणे सरकारला शक्य झाले. लोकांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होऊ लागले. परंतु अनेक नव्या समस्या समोर आल्या आहेत. अहमदाबाद आयआयएमच्या सहयोगी प्राध्यापक रितिका खेरा यांनी सांगितले की, ग्रामीण भागात बँकिंग व्यवस्थेची गंभीर टंचाई असल्याचे आम्हाला आढळून आले आहे.>१९ टक्के लोक वंचितमार्च २0१८पर्यंतच्या चार वर्षांत देशात २५ हजार बँक शाखा आणि ४५ हजार एटीएम केंद्रे उभारण्यात आली. तथापि, ही व्यवस्था अपुरी आहे. ईयू आणि असोसिएटेड चेम्बर्स आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजने २0१७मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, भारताची १९ टक्के लोकसंख्या अजूनही बँकांच्या कर्जसेवेपासून वंचित आहे.