Join us

दहावी जोड ४

By admin | Updated: June 20, 2014 21:24 IST

अकरावीत प्रवेश घेताय!

अकरावीत प्रवेश घेताय!
अकरावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी कॉलेजबद्दल संपूर्ण माहिती घ्यावी. आपल्याला कोणत्या विषयांची आवड आहे, त्यानुसार कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे ठरवावे. इतरांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्याप्रमाणे वागण्यापेक्षा स्वत:ला नक्की काय करायचे आहे, ते ठरवून त्याप्रमाणे कृती करावी. महाविद्यालयाची निवड करताना नक्की कोणत्या गोष्टींचा विचार करावा, याबद्दल अनेक विद्यार्थी संभ्रमात असतात. अशा वेळी त्यांनी आपल्याला आवड असणारे विषय आणि करिअर या दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा. त्यानुसार ते विषय कोणत्या कॉलेजमध्ये उत्तम शिकवले जातात हे पडताळून पाहावे. त्याचप्रमाणे कॉलेजमध्ये कोणत्या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत, हेसुद्धा बघणे आवश्यक ठरते. सायकॉलॉजीमधून डिग्री घ्यायची असेल तर अकरावीलाच हा विषय घेणे उपयुक्त ठरते. फाईन आर्टच्या पदवीला प्रवेश देताना चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेतील ग्रेडनुसार मार्क दिले जातात. (ए ग्रेड- १० गुण, बी ग्रेड- ६ गुण, सी ग्रेड- ४ गुण) त्यामुळे फाईन आर्ट घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी शाळेत इंटरमिजिएटची परीक्षा दिली नसल्यास अकरावीला असताना इंटरमिजिएट परीक्षा देणे उपयुक्त ठरेल.
आयुष्याचे गणित चुकले नाही
परीक्षा कोणतीही असो, त्यामध्ये अनुत्तीर्ण होण्यामागे अभ्यास न करणे हे एकच कारण असू शकते, असे नाही. त्यामुळे नापास झालो म्हणजे आयुष्याचे गणितच चुकले, असे नाही. नापास झाल्याने मनावर ताण नक्कीच येतो; पण तो दूर करण्यासाठी ज्ञानाची वाट शोधणे आवश्यक आहे. अभ्यासाची, ज्ञानार्जनाची कवाडे आपल्यासाठी कधीच बंद होत नाहीत. घरी बसून केवळ, असे कसे झाले, काय करावे याचा विचार करीत कपाळावर आठ्या पाडून बसण्यापेक्षा ज्ञानार्जनाच्या दिशेने पुन्हा आत्मविश्वासाने उचललेले पाऊल आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. काही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपले वर्ष वाया गेले असा विचारही विद्यार्थ्यांच्या मनात डोकावणार नाही. आर्थिक परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घेणे कठीण जाते, अशा विद्यार्थ्यांसाठी आयटीआयमध्येही अल्पकालावधीचे अभ्यासक्रम आहेत. दहावीत नापास झाल्याने निराश होण्याचे काहीच कारण नाही. ऑक्टोबर वा मार्चमध्ये आपण पुन्हा परीक्षा देऊ शकतोच; पण तोपर्यंतच्या मधल्या कालावधीत अल्प मुदतीचे अभ्यासक्रमही पूर्ण करता येतात. हे अभ्यासक्रम रोजगार मिळवून देण्यासाठीही मदत करतात. याबाबात चौकशी केल्यास माहिती मिळू शकते.