नवी दिल्ली - सामानाची ने-आण करण्यासह लॉजिस्टिक सेवा उपलब्ध करूव देणाऱ्या ईकॉम एक्स्प्रेस या कंपनींमध्ये पुढील काळात येणाऱ्या सणावारांच्या पार्श्वभूमीवर मोठी भरती निघाली आहे. ईकॉम एक्स्प्रेसमध्ये पुढच्या काही आठवड्यांमध्ये ३० हजार जणांची भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून होणाऱ्या नियुक्त्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतील. ई कॉमर्स कंपन्यांकडून सणावारांच्या दिवसांमध्ये होणाऱ्या मोठ्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
देशात कोरोना विषाणूचा फैलाव होण्यापूर्वी या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे २३ हजार एवढी होती. त्यानंतर कंपनीने लॉकडाऊन आणि नंतरच्या काळात वाढत असलेल्या ऑनलाइन ऑर्डर पूर्ण करण्याकरिता गेल्या काही महिन्यांमध्ये सात हजार ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानंतर आता दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढली ऑनलाइन मागणी विचारात घेऊन ३० हजार कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्याची तयारी कंपनीने केली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावानंतर लोकांकडून किराणा सामान, औषधे आणि अन्य वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांना प्राधान्य दिले जात आहे. याबाबत अधिक माहिती देताना ईकॉम एक्सप्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी सौरभ दीप सिंगला यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीने ई कॉमर्स उद्योगाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. आता पुढच्या काळात येणाऱ्या सणावारांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांकडून मोठी मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मागणीचा पुरवठा करण्यासाठी आम्ही या नियुक्त्या सुरू केल्या आहेत.
ही भरती प्रक्रिया १० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच या काळात सुमारे ३० हजार तात्पुरते रोजगार निर्माण करण्याची आम्हाला अपेक्षा आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या ३० हजार ५०० होती. गतवर्षी आम्ही सणावारांपूर्वी २० हजार कर्मचाऱ्यांची भरती केली होती. ही भरती तात्पुरती होती. मात्र पुढच्या काळातही रोजगार वाढल्याने आम्ही त्यापैकी एक तृतियांश कर्मचाऱ्यांना कामय नियुक्ती दिली, असे त्यांनी सांगितले.
आगामी सणावारांच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होणार असल्याची ई कॉमर्स कंपन्यांचा अंदाज आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून आपली क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. वॉलमार्टची मालकी असलेल्या प्लिपकार्टने पुरवठा वाढवण्यासाठी हल्लीच ५० हजार दुकांनांना आपल्यासोबत जोडले होते. तर अॅमेझॉनने विशाखापट्टणम, फारुखनगर, मुंबई, बंगळुरू आणि अहमदाबाद या पाच केंद्रांना जोडण्याची घोषणा केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी