पावसाची उसंत, पूर मात्र कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:44+5:30

गत आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जीवनदायी वैनगंगा नदीला पूर आला आहे. गत २४ तासापासून पावसाने उसंत घेतली असली तरी पूरपरिस्थिती मात्र कायम आहे. उगमस्थानाकडील पुजारीटोला, कालीसराड आणि धापेवाडा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे.

In the rains, however, the flood continued | पावसाची उसंत, पूर मात्र कायम

पावसाची उसंत, पूर मात्र कायम

Next
ठळक मुद्देकारधा पुलावर दोन मीटर पाणी : वैनगंगेचे ३३ दरवाजे उघडले, जिल्ह्यातील दोन मार्ग बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत २४ तासात पावसाने उसंत घेतली असली तरी वैनगंगेचा पूर मात्र कायम आहे. कारधा पुलावर सुमारे दोन मीटर पाणी असून गोसे प्रकल्पाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनीत सोमवारपासून पुराचे पाणी शिरले असून नदीतिरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील दोन मार्ग बंद आहेत. पुरात अडकलेल्या सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून जिल्ह्यात कुठेही जीवीतहानी झाली नाही.
गत आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जीवनदायी वैनगंगा नदीला पूर आला आहे. गत २४ तासापासून पावसाने उसंत घेतली असली तरी पूरपरिस्थिती मात्र कायम आहे. उगमस्थानाकडील पुजारीटोला, कालीसराड आणि धापेवाडा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. कारधा येथील छोट्या पुलावर मंगळवारी दिवसभर तब्बल दोन मीटर पाणी होते. धोक्याची पातळी २४४.५० मीटर असून सध्या २४६.४० मीटर पाणी पातळी आहे. यामुळे वैनगंगेचे पाणी शहरातील ग्रामसेवक कॉलनीत शिरले. या परिसरातील १०० च्या आसपास कुटूंब राहतात. त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. करचखेडा-सुरेवाडा, तुमसर तालुक्यातील सिहोरा - वारासिवनी आणि भंडारा शहर ते कारधा लहान पुल हा मार्ग बंद आहे.
पुजारीटोला प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून २७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कालीसराड प्रकल्पाचे दोन आणि धापेवाडा प्रकल्पाचे २३ गेट ८.५० मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे वैनगंगेला पूर आला आहे. गोसे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाल्याने या प्रकल्पाचे ३३ दरवाजे १.५० मीटरने उघडण्यात आले असून १००७६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीतिरावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ८२ गावांच्या सीमांपर्यंत वैनगंगेचे पाणी पोहचले आहे. त्यामुळे पूर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने उसंत घेतल्याने थोडा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात गत २४ तासात ५.७ मीमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र आगामी दोन दिवसात पाऊस बरसला तर पूर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. सर्व परिस्थितीवर जिल्हा आपत्ती निवारण विभाग लक्ष ठेवून असून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

नदीतीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा
जलशुद्धीकरण केंद्र पाण्याखाली

भंडारा : शहराला पाणीपुरवठा करण्यात वैनगंगा तीरावरील जलशुद्धीकरण केंद्र पुराच्या पाण्याखाली आले आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना होणारा नियमित पाणीपुरवठा दोन दिवसापासून बंद झाला आहे. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही गावांची आहे.

पुरात अडकलेल्या वृद्धाला सुरक्षित काढले
मोहाडी : तालुक्यातील जुना ढिवरवाडा येथील पुरात अडकलेल्या एका ७४ वर्षीय वृद्धाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. तुकाराम सदाशिव सोनी (७४) हा वैनगंगेच्या पुरात अडकला होता. प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर गावातील पट्टीचे पोहणारे भूनेश्वर मारबते, भाऊराव मेश्राम, श्रीधर देवगडे, प्रकाश केवट, सोमा मेश्राम यांनी जवळपास दीड किलोमीटर पाण्यात पोहत जाऊन रात्री ८.३० वाजता तुकारामला सुरक्षितपणे बाहेर काढले. प्रशासन आणि गावकऱ्यांच्या मदतीने ही मोहीम यशस्वी करण्यात आली. कारधा परिसरात सहा मजूर पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांनाही प्रशासनाने सुरक्षितपणे बाहेर काढले. या पुरामुळे भाजीपाला धानपीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. करचखेडा पुलावरुन पाच फुट पाणी वाहत होते.
 

Web Title: In the rains, however, the flood continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर