कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध- विश्वजित कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 03:52 PM2020-01-26T15:52:40+5:302020-01-26T15:54:18+5:30

भंडारा येथील मुख्य ध्वजारोहण सोहळा

Determined for the development of the District through Welfare Schemes -Vishwajeet Kadam | कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध- विश्वजित कदम

कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध- विश्वजित कदम

Next

भंडारा : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी व सामान्य माणसांच्या तसेच राज्याच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना, शिवभोजन योजना, विभागीय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय, शेती व सिंचन अशा विविध कल्याणकारी योजना शासनाने हाती घेतल्या असून भंडारा जिल्ह्यच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

प्रजासत्ताक दिनाच्या 70 वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण सभारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती , निवासी उपजिल्हाधिकारी  अभिमन्यु बोदवड उपस्थित होते.

भारतीय संविधानातील मुलतत्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्य स्वतंत्र्य भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारे आहे.   शालेय वयातील मुलांच्या संस्कारक्षम मनात याची रुजवणूक यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये परिपाठाच्या वेळी दररोज संविधान उद्देशिका समुह वाचनाचा उपक्रम शासनाने सुरु केला आहे.  या उपक्रमाची अंमलबजावणी आपल्या जिल्हयात आजपासून सुरु झाली आहे, असे ते म्हणाले.

राज्यात आज पासून दहा रुपयात भोजन देणारी शिव भोजन योजना शासनाने सुरु केली आहे. सुरुवातीला जिल्हयाच्या मुख्यालयी ही योजना राबविण्यात येणार आहे.  क्रमाक्रमाने या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. या योजनेचा गोरगरिब जनतेला निश्चित लाभ होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.        

जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्हयातील 34 हजार 922 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. कर्जमुक्ती योजनेत आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करावा, असे आवाहन त्यांनी केले. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत शासन योजना करीत आहे, असे ते म्हणाले.   

भात शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ब्राऊन राईस उद्योगाला विकसित करण्यासाठी शासन भात शेती मिशन राबविणार आहे. यामुळे कृषि प्रक्रिया उद्योग सुध्दा मोठया प्रमाणावर वाढेल. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने धानाला प्रती क्विंटल 700 रुपये अनुदान जाहिर केले आहे. शासन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.    

जिल्हयात खरीप हंगाम 2019-20 मध्ये 1 लाख 61 हजार 343 शेतकऱ्यांनी 74 हजार 881 हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा योजनेंतर्गत विमा काढला होता. विमा काढणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 67 कोटी 86 लाखाचा विमा देण्यात आला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  कृषिपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 8 हजार 110 कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गोसीखुर्द प्रकल्पातील 12 हजार 657 लाभार्थ्यांना गोसीखुर्द विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत 378 कोटी रकमेचे  तर प्रकल्पातील 699 वाढीव कुटूंबांना 20 कोटी 27 लाख रकमेचे वाटप करण्यात आले आहे. शासन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यास कटिबध्द पालकमंत्री म्हणाले.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत भंडारा जिल्हयातील 1 लाख 93 हजार 656 पात्र लाभार्थ्यांपैकी 1 लाख 73 हजार 517 लाभार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. पात्र सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री यांनी  दिली.नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मुख्यमंत्री सचिवालय 20 जानेवारी पासून कार्यरत झाले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, निवेदने यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.  या कक्षाचा भंडारा जिल्हयातील नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.        

खरीप हंगाम 2019-20 मध्ये  किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत 12 लाख 28 हजार 575 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून 39 हजार 382 शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला आहे. जिल्हयात 223 कोटीची धान खरेदी झाली असून त्यापैकी 171 कोटी  16 लाख  रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाऱ्यावर ऑनलाईन जमा केली आहे. उर्वरित 51 कोटी 81 लाख रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. असे त्यांनी सांगितले.

जिल्हयाच्या व राज्याच्या विकासासाठी शासन कटिबध्द आहे असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी पथक व विद्यार्थ्यांनी परेड संचलन करुन मानवंदना दिली. पोलीस विभाग, रेशीम कार्यालय, पाणी पुरवठा व स्वच्छता, हेल्मेट सक्ती, या विषयावर चित्ररथ काढण्यात आले. यावेळी विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. या कार्यक्रमास अधिकारी कर्मचारी, पत्रकार, नागरिक व विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Determined for the development of the District through Welfare Schemes -Vishwajeet Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.