नजर पैसेवारीत ८४४ गावे ५० पैशांपेक्षा अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:47+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणीचे संकट ओढावले. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील ९८ टक्के रोवणी आटोपली. जिल्ह्यात धान लागवडीसाठी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र निर्धारीत करण्यात आले. त्यापैकी धानपिकाची ९८ टक्के म्हणजेच १ लक्ष ७५ हजार ७२५ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे.
देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा$ : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही शेतकऱ्यांना बसला असताना प्रशासनाने घोषित केलेल्या नजर अंदाज पैसेवारीत जिल्ह्यातील ८४४ गावे ५० पैशापेक्षा अधिक आहेत. सुरूवातीला अपुरा पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी आणि कीडींचे आक्रमण अशा अवस्थेत पैसेवारी अधिक घोषित झाल्याने शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. ५० पेक्षा अधिक पैसेवारी असल्यास दुष्काटी मदतीची आशा मावळते.
यावर्षीच्या खरीप हंगामात ऑगस्ट महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार- तिबार पेरणीचे संकट ओढावले. सप्टेंबर महिन्यात मात्र पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने जिल्ह्यातील ९८ टक्के रोवणी आटोपली.
जिल्ह्यात धान लागवडीसाठी १ लाख ८० हजार १२५ हेक्टर क्षेत्र निर्धारीत करण्यात आले. त्यापैकी धानपिकाची ९८ टक्के म्हणजेच १ लक्ष ७५ हजार ७२५ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. सप्टेंबर झालेल्या पावसाने शेतकरी धिरावला असला तरी धान पूर्णपणे हाती येईपर्यंत पावसाची नितांत आवश्यकता आहे. सध्या उच्च प्रतीच्या धानाला एका पाण्याची गरज आहे. गत चार वर्षांपासून जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहेत. यावर्षी देखील पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने शेतात डौलाने उभे असलेले पीक एका पाण्याने व कीडींच्या प्रादूर्भावाने हातचे जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच धानाचे उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे.
जिल्ह्यात ८९८ महसुली गावे आहेत. आता महसूल विभागाने सादर केलेल्या नजर अंदाज पैसेवारीच्या अहवालात ८४४ गावांची खरीप पिकांची नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी ५० पैशापेक्षा अधीक दाखविली आहे.
धान पीक एका पाण्याने व किडींच्या प्रादुर्भावाने निसटण्याची शक्यता असताना महसूल विभागाने मात्र सरसकट सातही तालुक्यातील पैसेवारीस ५० पुढे असल्याचे म्हटले आहे. महसूल विभागाचा सुधारित पैसेवारीला अहवाल ३० ऑक्टोबर रोजी येणार असून १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत शेतकरी दुष्काळाच्या स्थितीत असतानाही नजर आणेवारी ५० पेक्षा अधिक निघाल्याने शासनाकडून मदतीची आशा मावळत चालली आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सध्यातरी कुणाचे लक्ष नाही.