Parshuram Jayanti 2021: कधी आहे परशुराम जयंती? रामाचे अस्त्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचवणारे भृगुनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 08:31 PM2021-05-12T20:31:21+5:302021-05-12T20:32:24+5:30

श्रीविष्णूंचा हा एकच अवतार असा आहे, जो चिरंजीव आहे, असे सांगितले जाते. परशुराम जयंतीनिमित्त जाणून घेऊया काही विशेष गोष्टी...

parshuram jayanti 2021 know about date and significance of lord parshuram jayanti | Parshuram Jayanti 2021: कधी आहे परशुराम जयंती? रामाचे अस्त्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचवणारे भृगुनंदन

Parshuram Jayanti 2021: कधी आहे परशुराम जयंती? रामाचे अस्त्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचवणारे भृगुनंदन

googlenewsNext

भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये सप्तचिरंजीवांचे महत्त्व विशेष असल्याचे सांगितले जाते. सप्तचिरंजीवांपैकी एक असलेले भृगुनंदन म्हणजे परशुराम. भृगुकुलातील जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा पुत्र भृगुकुलोत्पन्न म्हणून भार्गवराम असेही परशुराम यांचे नाव रूढ असल्याचे सांगितले जाते. श्रीविष्णूंचा सहावा अवतार म्हणून परशुरामांकडे पाहिले जाते. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीयेला परशुरामांचे अवतरण झाले, अशी मान्यता आहे. यंदा सन २०२१ मध्ये शुक्रवार, १४ मे रोजी अक्षय्य तृतीया असून, याच दिवशी परशुराम जयंती साजरी जाणार आहे. श्रीविष्णूंचा हा एकच अवतार असा आहे, जो चिरंजीव आहे, असे सांगितले जाते. परशुराम जयंतीनिमित्त जाणून घेऊया काही विशेष गोष्टी... (parshuram jayanti date 2021) 

यंदाची अक्षय्य तृतीया लाभदायी ठरावी, म्हणून करा हे पाच सोपे उपाय!
परशुरामांचे जन्मावेळेचे नाव रामभद्र होते, असे काही उल्लेख आढळून येतात. ते महादेव शिवशंकराचे खूप मोठे भक्त होते. भगवान महादेवांनी परशु अस्त्र त्यांना प्रदान केल्यामुळे त्यांना पुढे परशुराम म्हणून ओळखले जाऊ लागले. कामधेनूला पळवून नेणाऱ्या सहस्रार्जुन कार्तवीर्यार्जुनाचा वध परशुरामांनी केला. संपूर्ण देशभरात परशुरामांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी परशुरामांना अर्घ्य दिले जाते. 

व्यक्तीचे निधन झाल्यावर घरात पणतीचा दिवा लावण्यामागे काय शास्त्र? त्यावरून पुनर्जन्माचे संकेत खरोखरच मिळतात का? वाचा!

२१ वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा

परशुरामांना चारही वेद मुखोद्गत होते. ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचा अद्भूत संगम परशुरामांमध्ये आढळून येतो, असे सांगितले जाते. परशुरामाने २१ वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा करून १०८ शक्‍तीपीठे, तीर्थक्षेत्रांची म्हणजेच क्षेत्रपालदेवतांची स्थाने स्थापन केली आहेत. तसेच वाल्मिकी ऋषिंनी परशुरामांना 'क्षत्रविमर्दन' असे न म्हणता 'राजविमर्दन', असे म्हटले आहे. यावरून परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला, असे म्हणता येऊ शकते, असे सांगितले जाते.  

गणपती बाप्पा मोरया! एकदा तरी दर्शन घ्यावेच अशी ‘टॉप ५’ गणेशस्थाने

​धनुर्विद्येचे सर्वोत्तम शिक्षक

महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण इत्यादी थोर योद्धे परशुरामाचेच शिष्य होते. एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला. सर्वांना समभावाने अस्त्र-शस्त्र विद्या शिकवण्यास सुरुवात केली, असे सांगितले जाते. महाभारतात एकदा अंबेच्या याचनेवरून परशुराम आणि भीष्मचार्य यांच्यात घनघोर युद्ध झाले. हे युद्ध तब्बल २१ दिवस सुरू होते. परशुरामांना 'इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि' असे म्हटले जाते.

प्रसन्नतेचे शीतल शिंपण करणारा वैशाख मास धार्मिकदृष्ट्याही तेवढाच महत्त्वाचा!

परशुराम क्षेत्रेपरशुरामांनी कश्यपास सर्व भूमीचे दान दिल्यावर, पूर्वेकडील महेंद्र पर्वतावर जाऊन त्याने तपश्चर्या केली. सर्व पृथ्वी कश्यपास दान केल्यामुळे वसतीकरिता भूमी पाहिजे म्हणून पश्चिम सागराच्या तीरावर उभे राहून परशुरामांनी वरुणाची प्रार्थना केली. वरुणाने परशुरामांना नवी भूमी दिली. परशुरामांनी आपल्या पराक्रमाने समुद्र मागे हटविला व अपरांत (भडोचपासून केरळपर्यंत) प्रदेश निर्माण केला, अशीही कथा आहे. परशुरामाने आपला परशू दक्षिणेकडे फेकला व त्यामुळे शूर्पारक प्रदेश निर्माण केला. सध्या शूर्पारक म्हणजेच ठाणे जिल्ह्यातील सोपारा (नालासोपारा) हे परशुरामक्षेत्र मानले जाते. परशुरामांचे वास्तव्य कर्नाटकातील पवित्र 'गोकर्ण' क्षेत्री असल्याचेही मानतात. चिपळूण येथे 'लोटे परशुराम' हे त्यांचे जाज्वल्य स्थान मानले जाते. तळकोकणातील परशुराम मंदिर प्रसिद्ध आहे.

जेवणाआधी पाच घास कोणासाठी काढून ठेवले जातात आणि त्याचे फायदे काय, जाणून घ्या!

​रामाचे अस्त्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचवणारे परशुराम

रामायण आणि महाभारत या दोन्ही घटनांमध्ये परशुरामांचा उल्लेख आढळून येतो. सीतास्वयंवरावेळी शिवशंकरांचे शिवधनुष्य भंग केल्यावर मिथिलेत परशुराम प्रकट झाले. यावेळी ते महेंद्र पर्वतावर ध्यानस्त बसले होते. सुरुवातीला विष्णूस्वरूप श्रीरामांना परशुराम ओळखू शकले नाही. मात्र, श्रीरामांचे मूळ रुपाचे दर्शन परशुरामांना झाल्यावर ते तिथून निघून गेले. या भेटीदरम्यान श्रीरामांनी परशुरामांना सुदर्शन चक्र भेट दिले. द्वापारयुगात मी पुन्हा जन्म घेईन, तेव्हा याची गरज भासेल, असे श्रीरामांनी परशुरामांना सांगितले. द्वापारयुगात श्रीकृष्णाचा जन्म झाला. महाभारत युद्धाच्या काही दिवस आधी परशुरामांनी श्रीकृष्णांची भेट घेऊन श्रीरामांनी दिलेले सुदर्शन चक्र त्यांना सोपवले, अशी कथा आढळून येते.
 

Web Title: parshuram jayanti 2021 know about date and significance of lord parshuram jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.