खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली....तो आजचाच दिवस!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 28, 2021 02:48 PM2021-01-28T14:48:30+5:302021-01-28T14:48:58+5:30

महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या असंख्य कुलांचे खंडोबा हे कुलदैवत आहे. तो शंकराचा अवतार मानला जातो. त्याचा विवाह पौष पौर्णिमेला संपन्न झाला. म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांची ही विवाहतिथी मानली जाते. 

The bride got married at Khanderaya's wedding .... today is the day! | खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली....तो आजचाच दिवस!

खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली....तो आजचाच दिवस!

googlenewsNext

ज्योत्स्ना गाडगीळ 

'येळकोट येळकोट...जय मल्हार' म्हणत लाखो लोकांच्या उपस्थितीत दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेला खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सातारा येथील पाली मध्ये पार पडतो. मात्र, यंदा हा विवाह सोहळा मोजक्या मानकऱ्यांच्या साक्षीने दोन दिवसांपूर्वीच संपन्न झाला. प्रथेनुसार पेंबर गावातील मुख्य मंदिरातून देवाचे मुखवटे मानकरी नदीपलीकडे घेऊन जातात. यावेळी हे मुखवटे पालखीतून वाजत गाजत विवाहासाठी नेले जातात. यानंतर विवाह मंडपात मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून खंडोबा म्हाळसेचा विवाह सोहळा संपन्न होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाली खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आली. मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र मोजक्या लोकांच्या उपस्थितीत देवाचे धार्मिक विधी पार पाडण्यास शासनाने अनुमती दिली होती, त्यानुसार हा विवाहसोहळा पार पडला. 

महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकाच्या असंख्य कुलांचे खंडोबा हे कुलदैवत आहे. तो शंकराचा अवतार मानला जातो. जेजुरीच्या खंडोबाला मल्हारीमार्तंड, म्हाळसाकांत, मल्हारी अशा अनेक नावांनी गौरवले गेले आहे. त्याच्या पत्नीचे नाव म्हाळसा. ती तिम्मशेट वाण्याची मुलगी. तिम्मशेटला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्यानुसार स्वप्नपूर्ती करण्यासाठी तिम्मशेटनी तिचा विवाह खंडोबाशी करून दिला. हा विवाह पौष पौर्णिमेला संपन्न झाला. म्हणून पिढ्यानपिढ्या त्यांची ही विवाहतिथी मानली जाते. 

या विवाहदिनाची आठवण जागवणारा सोहळा सणासारखा साजरा होतो. हा एक लोकोत्सव आहे. पिढी दरपिढी चालत आलेल्या रितिरिवाजाप्रमाणे तो साजरा केला जातो. आपल्या लोकसंस्कृतीचा जवळून परिचय व्हावा, म्हणून प्रत्येकाने एकदा तरी या पवित्र विवाहसोहळ्यात उपस्थित राहून हे `देवकार्य' बघावे. शक्य झाल्यास आर्थिक मदत करावी. 

खंडोबाच्या लग्नाची अनेक लोकगीते प्रचलित आहेत. त्यापैकीच एक गीत जागरणाच्या वेळेस म्हटले जाते. आपणही खंडोबा आणि म्हाळसा विवाहप्रित्यर्थ ते गाणे म्हणून या विवाहसोहळ्याचा आनंद अनुभवूया.

म्या पाहिला पिवळा झेंडा गं, या देवाचा बाई।
रात्री मजला स्वप्न पडले,
मलूरायाचे दर्शन घडले,
हाती झळके खड्ग खंडा गं, या देवाचा बाई।
मुकुट शोभे शिरावरी,
अर्धांगी म्हाळसा सुंदरी,
झाला घोड्यावरती स्वार गं, देव पालीचा बाई।
तनमनधन तुझ्या चरणी वाहिले,
मज नाही देहभान राहिले,
तुझ्या चरणी अर्पण केला गं, देह अमुचा बाई।
सद्गुरु वाचूनी सापडेना सोयी,
मज कळेना अनुभव काही,
धोंडू पांडुभक्तीचा वेडा गं, चल सेवेला बाई।

Web Title: The bride got married at Khanderaya's wedding .... today is the day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.