अंबाजोगाई शहराने सोनवणेंना दिली ४६९५ मतांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:50 AM2019-05-27T00:50:40+5:302019-05-27T00:51:21+5:30

बाजोगाई शहर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडी देणारे शहर आहे. आजतागायत झालेल्या सर्वच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला शहरातून कायम आघाडी राहते. याही वेळी शहराने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना ४ हजार ६९५ मतांची आघाडी दिली आहे.

Ambajogai gave Sonavane 46,95 lead | अंबाजोगाई शहराने सोनवणेंना दिली ४६९५ मतांची आघाडी

अंबाजोगाई शहराने सोनवणेंना दिली ४६९५ मतांची आघाडी

googlenewsNext

अविनाश मुडेगावकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडी देणारे शहर आहे. आजतागायत झालेल्या सर्वच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला शहरातून कायम आघाडी राहते. याही वेळी शहराने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना ४ हजार ६९५ मतांची आघाडी दिली आहे. शहरात राष्ट्रवादी तर ग्रामीण भागात भाजप अशी स्थिती अंबाजोगाई तालुक्यात राहिली.
अंबाजोगाई तालुक्याचे विभाजन परळी व केज या दोन मतदारसंघात झालेले आहे. तालुक्यातील ६० गावे परळी, तर उर्वरित ४४ गावे केज विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत. यातील पट्टीवडगाव, घाटनांदूर, बर्दापूर व राडी हे चार गट परळी, तर चनई व मोरेवाडी हे दोनच गट केज विधानसभा मतदारसंघात येतात. केज विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठे शहर म्हणून अंबाजोगाईचा समावेश आहे. तालुक्यावर मोठ्या प्रमाणावर परळी मतदारसंघाचे प्राबल्य आहे.
केज विधानसभा मतदार संघात एकूण ४०७ मतदान केंद्रावर २ लाख ४१ हजार २५८ एवढे मतदान झाले होते. त्यापैकी भाजपच्या प्रीतम मुंडे यांना १ लाख १६ हजार २२९, राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना ९५ हजार २९३ तर बहुजन वंचित आघाडीचे प्रा. विष्णू जाधव यांना २० हजार ९०८ मते मिळाली. उर्वरित ३४ उमेदवारांना एकूण ८ हजार ८२८ मतांवर समाधान मानावे लागले. केज मतदार संघ हे बजरंग सोनवणे यांचे कार्यक्षेत्र आहे, साखर कारखान्यामुळे या भागात त्यांचा प्रभाव आहे. अंबाजोगाई आणि केज या शहरातील पालिका, सहकारी पक्ष काँग्रेसच्या ताब्यात आहे. स्वत: बजरंग सोनवणे आणि त्यांची पत्नी सारिका सोनवणे, शंकर उबाळे आणि बालासाहेब शेप हे याच मतदार संघातून जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.
अंबाजोगाई पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. एवढी सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे असतानाही प्रीतम मुंडे यांनी केज मतदार संघातून २० हजार ९३६ मतांची आघाडी घेतली. ही बाब राष्ट्रवादीला चिंतन करावयास भाग पाडणारी आहे.

गेवराईमध्ये भाजपचे मताधिक्य पूर्वीएवढेच; राष्ट्रवादीला फटका
सखाराम शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : गेवराई मतदार संघ हा लोकसभा निवडणुकीत पूर्वीपासून भाजपला मताधिक्य देत राहिला आहे. याही निवडणुकीत ३४ हजार ४६८ चे मताधिक्य भाजपच्या उमेदवाराला मिळाले असले तरी या निवडणुकीत दोन आजी माजी आमदार असताना देखील वाढ न होता पूर्वीचेच मताधिक्य राहिले आहे. वंचित बहुजन विकास आघाडी व एक अपक्ष यांच्या मताचा फटका राष्ट्रवादी उमेदवार बजरंग सोनवणे यांना बसला आहे.
हा मतदार संघ पूर्वीपासून भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य देत आला असून, याही निवडणुकीत ३४ हजार ४६८ मताधिक्य दिले. मात्र, विद्यमान आ. लक्ष्मण पवार, शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित तसेच पंचायत समिती, नगर परिषद, एक जिल्हा परिषद सभापती तसेच जि. प. - पं. स. सदस्य ही सत्तास्थाने भाजप - शिवसेनेकडे असतानाही म्हणावे तेवढे व वाढीव असे अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आ.अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी जोमाने प्रचार करत भाजपचे मताधिक्य वाढू दिले नाही ही यात जमेची बाजू आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विष्णू जाधव यांनी मतदार संघातून १२९३७ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार संपत चव्हाण यांनी ५५५२ मते मिळवली आहेत.या मताचा फटका राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना बसला आहे. उर्वरित ३२ उमेदवारांनी मतदार संघात ११४३० मते मिळाली आहेत. मतदार संघात एकूण ३ लाख ४८ हजार ९५५ मतदार आहेत त्यापैकी २ लाख ३४ हजार ३५२ जणांनी मतदान केले होते.

राष्ट्रवादीकडील जिल्हा परिषद गटामध्ये भाजपची मुसंडी
पुरुषोत्तम करवा।
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारत जि.प.चे सहाचे सहा गट व पंचायत समिती ताब्यात घेतली होती. परंतु या लोकसभा निवडणुकीत जि.प.च्या पाच गटात भाजपाने मुसंडी मारली, तर पात्रूड गटानेच राष्ट्रवादीचे नाक वाचवण्यात यशस्वी झाले असून, बहुतांश नेते आपापला किल्ला वाचवण्यात यशस्वी झाले.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या. यात माजलगाव तालुक्यात ६ गट व १२ पंचायत समिती गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी नेतृत्व केले होते. जिल्हा परिषद निवडणुकीत आ. आर. टी. देशमुख यांच्या चिरंजीवाला सुद्धा पराभव स्वीकारावा लागला होता तर मोहन जगताप यांच्या बालेकिल्ल्यात देखील राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला होता.
आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजलगाव तालुक्यातुन ३ हजार ५०० मतांची आघाडी भाजपला मिळाली. तालखेड गट हा मोहन जगताप यांचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी २ हजार ५०० मताची आघाडी भाजपला मिळाली. या गटावर नगरसेवक शरद यादव यांचे देखील वर्चस्व आहे. श्रृंगारवाडी या गावात भाजपाला आघाडी मिळाली. या गटात कल्याण आबूज सदस्य आहेत. केसापुरी गटात काही मोठी गावे भाजपला तर काही राष्ट्रवादीला आघाडी आहेत या गटात दोन्ही पक्ष बरोबरीत आहेत. या गटात प्रा. प्रकाश गवते हे जि. प. सदस्य आहेत.
गंगामसला जि.प. गटात या निवडणुकीत जवळपास २ हजार मतांची आघाडी भाजपला आहे. या गटात मंगला प्रकाश सोळंके सदस्य आहेत. याच गटात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालासाहेब जाधव यांचे गाव येत असून, त्यांच्या गावात भाजपला आघाडी आहे. या गटात शिवसेनेचे तालुका प्रमुख अप्पासाहेब जाधव यांचे गाव असून, त्यांच्या गावात भाजपला आघाडी आहे. त्यांनी या गटातून भाजपला आघाडी देण्यासाठी खूप मेहनत घेतली.
टाकरवण जि.प.गटात राष्ट्रवादीच्या वनिता विठ्ठल चव्हाण या सदस्य असून, या गटात भाजपला ३ हजार मतांची आघाडी आहे. दिंद्रूड गटात अनुसया रामप्रभु साळुंके हया सदस्या आहेत. या ठिकाणी देखील भाजपला मोठी आघाडी आहे. तर पात्रुड जि.प.गटात चंद्रकांत शेजूळ हे सदस्य असुन या गटात राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हजारापेक्षा जास्त आघाडी असून, पात्रूडमध्ये अकराशे मतांपेक्षा जास्त आघाडी आहे.
माजीमंत्री प्रकाश सोळंके यांच्या मूळ मोहखेड या गावात राष्ट्रवादीला मोठी आघाडी असून, पंचायत समितीच्या सभापती अल्का जयदत्त नरवडे यांच्या माळेवाडीत राष्ट्रवादीला आघाडी मिळवुन दिली. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य मनोज जगताप यांच्या सावरगावात भाजपला मोठी आघाडी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक डक यांच्या गावात मात्र भाजपाला मोठी आघाडी मिळाली.

गावातील आघाडी स्थानिक नेत्यांसाठी चिंतेचा विषय
अनिल महाजन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारुर : तालुक्यात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या स्थानिक नेत्याला विशेषत: गुत्तेदार नेत्यास सार्वसामान्य जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे. काही न बोलता मतदान यंत्रातून हा धडा शिकवला असून, अनपेक्षित बाबी निकालपेटीतून समोर आल्या आहेत. कार्यकर्ता किंवा स्थानीक नेता म्हणवणाऱ्या प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे.
धारुर तालुक्यात जात व उसाच्या प्रश्नावर लोकसाभा व विधानसभा निवडणुका होतात. मात्र, या लोकसभा निवडुणकीत तालुका पातळीवर नेतृत्व करणाºया स्थानिक कार्यकर्त्यांना मतदारांनी लक्ष्य केल्याचे निकालानंतर स्पष्ट दिसत आहे. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. ईश्वर मुंडे यांच्या गांजपूर येथे भाजपाला २०० पेक्षा जास्त मताची आघाडी मिळाली आहे. ही त्यांच्यासाठी निश्चित विचार करयला लावणारी बाब आहे. जि. प. लालासाहेब तिडके हे त्यांच्या गावात स्वत:ला मतदान घेऊ शकतात, पक्षाला नाही यावरून त्यांची राजकीय जुळवाजुळवीच राजकारणासमोर येत आहे.
नेहमी प्रकारे भाजपला ११०० पेक्षा जास्त मतांची आघाडी आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष अंगद मुंडे यांच्या गावात भाजपाला फक्त ८० मतांची आघाडी आहे. धुनकवड हे भाजप विभागीय प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या गावात फक्त ३४ मतांची आघाडी पक्षाला मिळाली आहे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनिल शिनगारे यांच्या अरणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसला ५१ मतांची आघाडी आहे. मोहखेड हे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे गाव. येथे नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीला आघाडी आहे. मात्र, वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराने येथे घेतलेल्या ३२० पेक्षा जास्त मते त्यांच्या काळजाला धक्का लावणारे व विधान सभेच्या दृष्टीने धोक्याचे ठरु पाहत आहे.
शहरात भाजपला मानणारा वर्ग मोठा असताना फक्त ८० मतांच्या आसपास आघाडी मिळाली आहे. ही आघाडी न मिळाल्यात जमा असून आत्मचिंतनाची गरज आहे हे मात्र निश्चित.

Web Title: Ambajogai gave Sonavane 46,95 lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.