खरमडी नदीवरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:06 AM2021-05-09T04:06:04+5:302021-05-09T04:06:04+5:30
केळगाव : केळगाव ते सपकाळ वस्तीकडे जाणाऱ्या तीन किलोमीटर रस्त्यावरील खरमडी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ...
केळगाव : केळगाव ते सपकाळ वस्तीकडे जाणाऱ्या तीन किलोमीटर रस्त्यावरील खरमडी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे. पुलाला जागोजागी तडे गेले असून दोन महिन्यातच या बोगस कामाचे पितळ उघडे पडले आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाचे काम करण्यात आले. परंतु पुलाच्या कामात सिमेंटचा वापर कमी झाला असून मातीमिश्रीत वाळूचा समावेश असल्याने या कामाचा दर्जा घसरला आहे. अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून थातुरमातुर पद्धतीने पुलाचे काम केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या कामाचे गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी मूल्यमापन करून संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पुलाच्या दोन्हीही बाजूने मोठमोठे तडे जाऊन भेगा पडल्या आहेत. दोनच महिन्याच्या आत या पुलाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. उन्हाळ्याच्या काळातच ही बाब निदर्शनात आल्याने नव्याने पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात नदीच्या पुराने पूल वाहून जाण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा पूल बांधणी करावी, अशी मागणी दत्तू सुलताने, ज्ञानेश्वर शिंदे, संजय वाघ, नाना जाधव, यादवराव सपकाळ, विशवनाथ मुळे, रोहीदास पवार, शालिकराव जाधव, कचरू सपकाळ, राधाकिसन शेळके, विश्वनाथ मुळे या ग्रामस्थांनी केली आहे.
अधिकारी म्हणतात स्वत: पाहणी करू
पुलाचे काम दर्जेदार झाले असावे. परंतु गावकऱ्यांची यासंदर्भात तक्रार असेल तर प्रत्यक्ष पुलाची पाहणी केली जाईल. जर निकृष्ट दर्जाचे काम झालेले असेल तर नव्याने काम केले जाईल, असे सिल्लोड बांधकाम विभागाचे उपअभियंता कल्याण भोसले यांनी सांगितले. तर प्रत्यक्ष कामावर देखरेख करणारे अभियंता राजगुरू यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
080521\img_20210506_111247_256_1.jpg
खरमडी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाला असे तडे गेले आहे.