महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार हरवला; निवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 03:48 PM2021-02-24T15:48:44+5:302021-02-24T15:50:54+5:30

Retired Administrative Officer Bhujangrao Kulkarni passes away १९३९ मध्ये ते निजाम राजवटीत मेदक तालुक्यात ‘तहसीलदार’ या पदावर मुलकी प्रशासकीय सेवेत रुजू झाले

Witness of Maharashtra development lost; Retired Administrative Officer Bhujangrao Kulkarni passes away | महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार हरवला; निवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन

महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार हरवला; निवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाडा आणि  महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरुकपणे कर्तव्य बजावलेले आणि राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे १०४ व्या वर्षी निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व हैदराबाद संस्थानात १९३९ मध्ये  प्रशासकीय नोकरीतून आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणारे भुजंगराव कुलकर्णी हे १९७४ च्या अखेरीस राज्याच्या सिंचन विभागाचे भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून निवृत्त झाले होते. 

निवृत्तीनंतरही मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, भुजंगराव हे पीएच.डी. झालेले नसतानाही त्यावेळचे राज्यपाल अलियावर जंग यांनी विद्यापीठाला चांगला प्रशासक हवा म्हणून त्यांना मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नेमले. भुजंगरावांनी ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. राज्य नियोजन मंडळावर व दांडेकर समितीवर सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दांडेकर समिती, न्हावाशेवा बंदर, अकृषी-विद्यापीठांची लेखासमिती, मराठवाडा ग्रामीण बॅंक, मराठवाडा वैधानिक मंडळ, कापूस एकाधिकार योजना पुनर्विलोकन समिती, राज्य नियोजन मंडळ, टेक्‍स्टाईल मिल, राज्य सिंचन आयोग, अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सरस्वती भुवन, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, सेंट्रॉन कंपनी, आयसीम कॉलेजसारख्या अनेक संस्थांद्वारे ते सतत कार्यरत राहिले. 

१९५२ ते २०१९ नॉनस्टॉप मतदान
देशात संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९५२ साली लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते २०१९ ला झालेल्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत सेवानिवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

पहिल्या जणगणनेचे प्रमुख म्हणून काम 
१ मे १९६० ला महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली. या दरम्यान, मुंबईत भारताच्या पहिल्या जणगणनेचे अवघड आणि जोखमीचे काम भुजंगराव यांनी मोठ्या कुशलतेने पार पाडले. तत्कालीन २६ जिल्ह्यातील जवळ जवळ १ लाख गणनाकारांना प्रशिक्षण देणे, व त्यांच्याकडून काम करून घेणे असे प्रचंड काम त्यांना करावे लागले.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आणि सारस बागेची उभारणी
भुजंगराव कुलकर्णी यांची १९६५ ला पुणे महानगर पालिकेत आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. या काळात पुण्याचे नेहरू स्टेडियम, बालगंधर्व रंगमंदिर, मंडईची इमारत, स्वच्छ पाणी, पुरवठा, चौकांची व रस्त्यांची सुधारणा, सारस बाग ही कामे त्यांच्या हातून पार पडली. पुण्याच्या प्रगतीतील हे मैलाचे दगड आजही ठसा उमटवून आहेत. 

भुजंगराव कुलकर्णी यांची कारकीर्द
भुजंगराव आप्पाराव कुलकर्णी यांचा जन्म परळी तालुक्यातील पिंपळगाव या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. १९३२ ला औरंगाबाद येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३४ ला वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. १९३६ साली हैदराबाद येथून ते  प्रथम क्रमांकाने बी.एस्सी. उत्तीर्ण होऊन  त्यांनी उस्मानिया विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले. १९३८ साली ते ह्याच विद्यापीठातून भौतिकशास्त्रामध्ये एम.एस्सी  प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३९ मध्ये ते निजाम राजवटीत मेदक तालुक्यात ‘तहसीलदार’ या पदावर मुलकी प्रशासकीय सेवेत रुजू झाले. १९४० ला ते ‘डिस्ट्रीक्ट लँड रेकॉर्ड ऑफीसर’ म्हणून औरंगाबाद येथे रुजू झाले. १९४७ ला ते ‘असिस्टंट कमिशनर’ या श्रेणी-१ च्या मुलकी सेवेत आले. ते १९५० साली आयएएस झाले. १९५३ ला ते नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. 

१९५४ ला भूमी आयोग स्थापन झाला. त्या विभागाचे सचिव म्हणून भुजंगरावांची नेमणूक झाली. या आयोगाचा अहवाल सचिव म्हणून भुजंगरावांनी तयार केला. १९५६ ला राज्य पुनर्रचनेमुळे मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांबरोबर भुजंगराव मुंबई राज्यात आले आणि औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. १९५९ला ते जनगणनेच्या कामासाठी भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या जनगणनेसाठी ‘प्रमुख’ म्हणून त्यांनी काम पाहिले. 

१९६५ ला पुणे महानगर पालिकेकडे ते म.न.पा. आयुक्त म्हणून आले. १९६९ ला ते सचिव म्हणून मुंबईत आले. सुरूवातीला नगरविकास, आरोग्य व गृहनिर्माण या तीन खात्याचे सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. १९६९च्या अखेरीस त्यांनी राज्याच्या सिंचन विभागाचा सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली व १९७४ च्या अखेरीस भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून ते निवृत्त झाले. 

Web Title: Witness of Maharashtra development lost; Retired Administrative Officer Bhujangrao Kulkarni passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.