अल्पभूधारक शेतकऱ्याने शेळीपालनातून साधली प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:05 AM2021-04-13T04:05:36+5:302021-04-13T04:05:36+5:30
अंधारी येथील शेतकरी लक्ष्मण सुभाष पांडव यांचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले आहे. केवळ १ एकर कोरडवाहू शेती असलेल्या ...
अंधारी येथील शेतकरी लक्ष्मण सुभाष पांडव यांचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले आहे. केवळ १ एकर कोरडवाहू शेती असलेल्या या अल्पभूधारक शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होती. कमी शेती व त्यातही नैसर्गिक विघ्ने यामुळे तीन मुली, एक मुलगा अशा परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी बँकेचे कर्ज काढून तीनचाकी गाडी खरेदी करून भाडेतत्त्वावर चालवून कुटुंबाची उपजीविका भागविणे सुरू केले. तो व्यवसायही फारसा फायद्यात नसल्याने त्यांनी कमी खर्चाच्या शेळीपालन व्यवसायाला २०१४ मध्ये सुरुवात केली. सुरुवातीला पांडव यांनी गावातील शेतकऱ्यांकडून दोन शेळ्या विकत घेतल्या. शेताच्या बांधावरील चारा, शेताजवळील डोंगरमाथ्यावर शेळ्यांना चारून संगोपन सुरू केले. यानंतर त्यांच्याकडे शेळ्या वाढत गेल्या. तसे उत्पन्नही मिळत गेले. शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी दहा बाय चाळीस फुटांचा पूर्व-पश्चिम पत्र्याचा गोठा त्यांनी बांधला. भरउन्हाळ्यात गोठ्यात शेळ्यांना पुरेसे पाणी पिण्यास मिळावे, म्हणून विकत पाणी घेऊन पाण्याची व्यवस्था केली. गोठ्यात ठेवलेल्या भांड्यांतून शेळ्या गरजेप्रमाणे पाणी पितात. दिवसातून दोनवेळा स्वच्छ पाण्याने भांडी भरली जातात. पांडव दररोज सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास शेळ्या शेताजवळील डोंगरमाथ्यावर चारावयास नेतात. शेळ्यांचे व्यवस्थापन ते व त्यांची पत्नी अनिता करतात. चाऱ्यासाठी ते मका विकत आणून भरडून ठेवतात. तसेच सोयाबीन, हरभरा, तूर आदी पिकांचे भूस ते विकत घेतात. याद्वारे चाळीस शेळ्यांची अन्नाची गरज भागविली जाते. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत शेळ्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे बोकड आणि पाठी विकून त्यांनी चांगला नफा मिळविला आहे. याबरोबरच त्यांनी गावरान ५० कोंबड्या पाळल्या असून त्यापासून ३० ते ४० अंडी ते दहा रुपये नगाप्रमाणे दररोज विकून ते नफा कमावतात.
चौकट
अशी ठेवली जाते निगा
प्रत्येक शेळीस दररोज गरजेप्रमाणे दोन किलो हिरवा चारा दिला जातो. तसेच जंतनिर्मूलन केले जाते. करडांना पुरेसे दूध पाजले जाते. शेळ्यांमध्ये कोणत्याही रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवली जाते. दोन महिन्यांतून एकदा शेळ्या धुतल्या जातात.
चौकट
आर्थिकदृष्ट्या फायद्याचे
साधारणपणे सहा महिन्यांची करडे वजनावर विकली जातात. व्यापारी स्वतः गोठ्यावर येऊन करडांची खरेदी करतात. पांडव यांना दोन वर्षांत खर्च वजा जाता चांगला नफा मिळाला आहे. तसेच वर्षभरात तीन ते चार ट्रॉली लेंडीखत विक्रीतूनही त्यांना पैसे मिळतात. सध्या त्यांच्याकडे शेळ्या असून ग्रेडिंगसाठी दोन बोकड आहेत. सध्या विक्रीस आलेल्या २२ करडांमधून त्यांना दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.
फोटो :
120421\rais shaikh_img-20210313-wa0061_1.jpg
अंधारी बातमीतील छायाचित्र.