मोलकरणींना अनेक दरवाजे बंद; कुटुंबाचा गाडा चालणार कसा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:05 AM2021-04-13T04:05:31+5:302021-04-13T04:05:31+5:30
औरंगाबाद : मागच्यावर्षी लॉकडाऊन लागले आणि मोलकरणींच्या कामावर गदा आली. यावर्षीही पुन्हा तेच होईल की काय, अशी धास्ती ...
औरंगाबाद : मागच्यावर्षी लॉकडाऊन लागले आणि मोलकरणींच्या कामावर गदा आली. यावर्षीही पुन्हा तेच होईल की काय, अशी धास्ती निर्माण झाली असून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आता मोलकरणींसाठी अनेक घरांचे दरवाजे बंद करणारी ठरली आहे. यामुळे कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, हा प्रश्न आता अनेक मोलकरणींना पडला आहे. मोलमजुरी करणारी एक महिला कमीतकमी ४ ते ५ घरची कामे करत असते. तिच्या घरचे लोकही कामानिमित्त इतर ठिकाणी जात असतात. त्यामुळे तिच्या संपर्कात दररोज येणाऱ्या व्यक्ती पाहून तिच्यापासून आपल्या घरात कोरोनाचा संसर्ग येण्याची भीती बहुतांश गृहिणींना वाटते. त्यामुळे एकवेळ कामाचा ताण पडला तरी चालेल पण मोलकरणींच्या माध्यमातून येणारा काेरोना नकाे, असे म्हणत बऱ्याच गृहिणी मोलकरणींना कामावरून कमी करत आहेत.
आम्हालाही कामासाठी इतरांच्या घरात जाताना आमच्या जीवाची भीती वाटते. पण पोट भरण्यासाठी दुसरा इलाज नसल्याने जिवाचा धोका पत्करून आम्ही इतरांकडे कामे करतो. ज्यांना अजिबातच काम होत नाही, जे वृद्ध आहेत, असेच लोक आम्हाला याही दिवसांमध्ये कामाला बोलवितात, असे काही मोलकरणींनी सांगितले.
चौकट :
मोलकरणींची साधारण संख्या
अंदाजे ६०००
मोलकरणींच्या हाताला मिळेना काम
अंदाजे ३० टक्के
चौकट
एका घरातून कमीतकमी ६०० रुपये
औरंगाबाद शहरातील बहुसंख्य वस्त्यांमध्ये भांडी, धुणे, झाडू- फरशी या सगळ्या कामांसाठी प्रत्येकी ६०० रुपये एवढा दर आकारला जातो. काही ठिकाणी हे दर ७०० रुपये प्रतिकाम एवढेही असतात. अनेक घरांमध्ये धुणे- भांडी आणि झाडू-फरशी अशा सगळ्याच कामासाठी मोलकरीण असते. तर काही घरांमध्ये केवळ भांडी घासण्यासाठी सांगितले जाते. त्यामुळे एका मोलकरणीला एका घरातून कमीतकमी ६०० रुपये महिना तरी मिळत असतो. पोळ्या किंवा एकवेळच्या स्वयंपाकाचे दर १००० ते २००० यादरम्यान आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये स्वयंपाक करण्याचे काम बहुसंख्य महिलांचे कमी झाले होते. यावेळीही रुग्ण वाढू लागताच एप्रिल महिन्यापासून अनेक घरांमध्ये स्वयंपाक करणाऱ्या मोलकरणींना कामावरून कमी करण्यात आले आहे.
चौकट :
घर कसे चालवायचे याचीच चिंता..
पुन्हा एकदा लॉकडाऊन लागले तर आपोआपच बरीचशी कामे बंद होणार. त्यामुळे उत्पन्नही थांबणार. मग घर कसे चालवायचे असा प्रश्न बहुसंख्य मोलकरणींना पडला आहे. ज्या घरी या महिला एकट्याच कमावत्या आहेत किंवा ज्यांचे पती व्यसनी आहेत, अशा महिलांची चिंता तर अधिकच वाढलेली आहे.
चौकट :
कुटुंबाचे पोट कसे भरणार
१. पतीचा व्यवसाय जेमतेम आहे आणि तोदेखील सध्या बंद पडलेला आहे. मुलीचे नुकतेच लग्न ठरले आहे. अशा परिस्थितीत जर पुन्हा लॉकडाऊन लागले तर हातात आहेत, त्यातील निम्म्याहून अधिक कामे बंद होऊन जाणार. त्यामुळे पोट कसे भरायचे हा प्रश्न तर आहेच पण लेकीच्या लग्नासाठी पैसा कसा उभा करायचा, ही चिंता पण आहे.
- मीना शेळके
२. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने एप्रिल महिन्यापासूनच दोन- तीन घरची कामे सुटली आहेत. आता पुन्हा जर रुग्ण अधिक वाढू लागले आणि लॉकडाऊन लागले तर उरलेली कामे जाण्याचीही धास्ती वाटते. आधीच महागाई एवढी वाढत असताना, पोरांचे शिक्षण चालू असताना हातातली कामे बंद होणे, आम्हाला अजिबातच परवडणारे नाही.
- कविता पवार