Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेतील दोन दानवेंनी मिळून बंडखोरांना केले थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 06:52 PM2019-10-08T18:52:26+5:302019-10-08T18:53:01+5:30

बंडखोरी थंड करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून प्रयत्न केले.

Maharashtra Election 2019: Two Danave's of BJP-Sena have made the rebels calm | Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेतील दोन दानवेंनी मिळून बंडखोरांना केले थंड

Maharashtra Election 2019 : भाजप-सेनेतील दोन दानवेंनी मिळून बंडखोरांना केले थंड

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद पश्चिममध्ये राजू शिंदे  वगळता उर्वरित ठिकाणी यश

औरंगाबाद : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली बंडखोरी थंड करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून प्रयत्न केले. त्यात औरंगाबाद पश्चिममध्ये राजू शिंदे  वगळता उर्वरित ठिकाणी यश मिळाल्याची माहिती आ. दानवे यांनी दिली.

औरंगाबाद पूर्वमधून बंडखोरी केलेले राजू वैद्य यांना बोलावून घेत अर्ज मागे घेण्याचा निरोप देण्यात आला. त्यांना विश्वनाथ नेरूरकर यांनी मुंबईतून फोन केला. फुलंब्रीतील शिवसेना बंडखोर रमेश पवार यांना आ. दानवे यांनी शांत केले. औरंगाबाद मध्यमधून किशनचंद तनवाणी यांना माघार घेण्यास रावसाहेब दानवे यांनी भाग पाडले. तनवाणी यांनी माघार घेतल्यामुळे पश्चिममधून बाळासाहेब गायकवाड यांनीही माघार घेतली. वैजापूरमधील भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आणि दिनेश परदेशी यांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश रावसाहेब दानवे यांनी  दिले. 

असे राहणार जिल्ह्याचे चित्र

औरंगाबाद पूर्व : ३४ उमेदवार रिंगणात
औरंगाबाद पूर्वमध्ये ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाचे अतुल सावे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी आणि समाजवादी पार्टीचे कलीम कुरेशी यांच्यात लढत होणार आहे. २०१४ मध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस  अशी पंचरंगी लढत झाली होती. या लढतीत राज्यमंत्री अतुल सावे यांचा निसटता विजय झाला होता. तर डॉ. गफ्फार कादरी यांना पराभवाला समोरे जावे लागले होते. 

औरंगाबाद पश्चिम : १२ उमेदवार रिंगणात
औरंगाबाद पश्चिम मतदार संघात शिवसेनेचे संजय शिरसाठ, एमआयएमचे अरुण बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाठ तसेच अपक्ष म्हणून भाजपाचे राजू शिंदे यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर राजू शिंदे आणि सेनेचे संजय शिरसाठ यांच्या लढत होण्याची चिन्हे आहेत. 

औरंगाबाद मध्य : १४ उमेदवार रिंगणात
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार नशीब अजमावत आहेत. मतदारसंघात शिवसेना विरूद्ध एमआयएम अशी थेट लढत होण्याची चिन्हे आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीमुळे ही  निवडणूक सध्या तरी चौरंगी दिसते आहे. २०१४ मध्ये या मतदार संघातून एमआयएमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले होते. तर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल पराभूत झाले होते.

सिल्लोड : ७ उमेदवार रिंगणात 
उमेदवारी मागे घेत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्यामागे उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर व शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्यात थेट लढत होईल, असेच चित्र सध्या आहे.

वैजापूर : १६ उमेदवार रिंगणात 
वैजापूर विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात असून, सध्या तरी शिवसेनेचे रमेश बोरनारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय पाटील चिकटगावकर यांच्यातच थेट लढत होईल, असे चित्र आहे. भाजपचे बंडखोर डॉ. दिनेश परदेशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे बोरनारे यांची कोंडी झाली होती; परंतु सोमवारी दोघांनीही उमेदवारी मागे घेतल्याने पेच संपुष्टात आला. 

कन्नड : ८ उमेदवार रिंगणात
कन्नड विधानसभा मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई  हर्षवर्धन जाधव व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे आमने-सामने असून, दोघेही अपक्ष आहेत. भाजपचे जि. प. सदस्य किशोर पवार यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर हर्षवर्धन जाधव यांचीही डोकेदुखी वाढली आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे.

फुलंब्री : १३ उमेदवार रिंगणात 
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे हरिभाऊ बागडे व  काँग्रेसचे डॉ.  कल्याण काळे या दोघांमध्ये थेट लढत झाली होती. यावेळीही बागडे व डॉ. काळे यांच्यातच थेट लढत होण्याची शक्यता आहे. 

पैठण : १५ उमेदवार रिंगणात
पैठण विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याही वेळी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होणार  असल्याचे चित्र दिसत असले तरी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांपुढे वंचित बहुजन आघाडीचे मोठे आव्हान राहणार आहे. 

गंगापूर : १४ उमेदवार रिंगणात 
गंगापूर विधानसभा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याठिकाणी भाजपचे प्रशांत बन्सीलाल बंब व राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष अण्णासाहेब माने यांच्यातच थेट लढत होईल, अशी स्थिती दिसत आहे.  

Web Title: Maharashtra Election 2019: Two Danave's of BJP-Sena have made the rebels calm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.