फ्रीज, जारमुळे माती भांड्यांचा व्यवसाय संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:06 AM2021-02-28T04:06:07+5:302021-02-28T04:06:07+5:30
बनकिन्होळा : उन्हाची चाहूल लागताच प्रत्येक घरोघरी थंड पाण्याचे माठ पाहायला मिळायचे. परंतु आज प्रत्येक घरातील माठांची जागा आता ...
बनकिन्होळा : उन्हाची चाहूल लागताच प्रत्येक घरोघरी थंड पाण्याचे माठ पाहायला मिळायचे. परंतु आज प्रत्येक घरातील माठांची जागा आता फ्रिज आणि थंड पाण्याच्या जारने घेतली आहे. त्यामुळेे परंपरागत मातीच्या भांड्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे.
लखलखत्या उन्हात घशाला पडणारी कोरड माठातील थंड पाणी पिल्यानंतर खऱ्या अर्थाने शमते. परंतु यांत्रिकीकरणाच्या युगात तहान भागवणारे माठ कालबाह्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे. थंड पाण्याची गरज भागवण्यासाठी आता फ्रिज, जार, कॅनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे मातीच्या भांड्याची मागणी आता कमी झाली आहे. कुंभार समाजातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असतो. परंतु दिवसेंदिवस मागणी कमी झाल्याने हा व्यवसाय धोक्यात आलेला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आता मातीच्या भांड्यांची जागा फ्रिज, जारने घेतली. थंड पाण्यासाठी जारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
माठांची मागणी झाली कमी
पूर्वीसारखे आमच्या माठांना मागणी राहिली नाही. घरोघरी फ्रिज आणि थंड पाण्याचे जार मागविले जात आहेत. त्यामुळे मातीची भांडी आता घरोघरी खरेदी केली जात नाहीत. आता ती खरेदी पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यात विक्रेत्यांची संख्या देखील जास्त झाल्याने काहीअंशी व्यवसायावर परिणाम झालेला आहे. तरी देखील परंपरागत व्यवसाय चालू ठेवण्यासाठी आमची ध़डपड सुरू आहे.
- लक्ष्मण दगडघाटे, मातीभांडे विक्रेता