प्रदेशाध्यक्षपद गेल्याने दानवे समर्थकांचे चेहरे उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 01:24 PM2019-07-19T13:24:56+5:302019-07-19T13:27:40+5:30
आता राजूरच्या गणपतीऐवजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन
- विकास राऊत
औरंगाबाद : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम लावत भाजपने त्यांच्याकडून प्रदेशाध्यपदाची जबाबदारी काढून घेतली. महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर ती जबाबदारी दिली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पद गेल्यामुळे दानवे समर्थकांचे चेहरे उतरले आहेत. आता समर्थकांनी नूतन प्रदेशाध्यक्षांशी जवळीक असणाऱ्यांची मनधरणी करण्यास सुरूवात केली आहे. शहरातील भाजपचे काही पदाधिकारी कोल्हापूरच्या नेटवर्कमध्ये आहेत, त्यांच्याशी जवळीक साधून विधानसभा व इतर पद पदरात पाडून घेण्याचा विचार काहींच्या डोक्यात घोळू लागला आहे. यापुढे राजूरच्या गणपती ऐवजी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाजप पदाधिकारी आवूर्जन जातील.
२०१४ मध्ये केंद्र आणि राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री पद काढून घेत दानवे यांना प्रदेशाध्यपदाची जबाबदारी दिली. सुमारे पाच वर्ष ते पदावर राहिल्यामुळे त्यांची पक्ष संघटनेत चांगलीच ‘घडी’ बसली होती. २०१५ च्या मनपा निवडणुकीपासून आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षातून जे कुणी पक्षात आले, त्यांना राज्यमंत्री दानवे यांनी विधानसभा उमेदवारीसह इतर पदांवर बसविण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला होता. त्या सर्व इच्छुकांचे अवसान मंगळवारपासून गळाले आहे. संघटन सत्तेचे केंद्र मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात सरकल्यामुळे संघटनेतील ‘दादागिरी’ आता संपुष्टात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. फु लंब्री आणि पूर्व मतदारसंघातील इच्छुकांना आता पळता भूई थोडी होणार आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील एक गट दानवे यांच्यासाठीच सक्रीय असायचा. प्रदेशाध्यक्ष संघाच्या मुशीतील असल्यामुळे त्या गटाच्या इच्छा, आकांक्षांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत संघटन पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होतील, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
महामंडळ अध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले
एका पक्षातून उडी मारून भाजपमध्ये आल्यानंतर राज्यमंत्री दानवे यांच्या मागे-पुढे करणाऱ्याला एका आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व्हायचे होते. गेल्या आठवड्यात सदरील इच्छुकाने राज्यमंत्री दानवे यांच्यासोबत मुंबईवारी करून पद मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु पदरी निराशा आल्यामुळे सगळा विषय ठप्प झाला. परंतु लायझनिंग करण्यात काही आयाराम (इतर पक्षातून आलेले) तरबेज आहेत. ते आता चतुर्थीच्या दिवशी राजूरच्या गणपतीच्या दर्शनाला जाण्याऐवजी दर पोर्णिमेला कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.