विधानपरिषद निवडणूक : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी चिकलठाणा परिसरात मतमोजणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 11:27 AM2020-12-03T11:27:10+5:302020-12-03T11:34:22+5:30
आठ जिल्ह्यांतील ६१ टक्के पदवीधर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावून निकालाची चुरस वाढविली आहे.
औरंगाबाद: मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणीस कलाग्राम, एमआयडीसी चिकलठाणा परिसरात गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण, भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासह ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशा पक्षीय स्वरूपाने या निवडणुकीत प्रचार केला गेला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून विक्रमी ६१ टक्के मतदान झाले आहे. आज या ६१ टक्के मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होणार आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी मतमोजणी संदर्भात मार्गदर्शन केले. यामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्राथमिक आकडेवारीनुसार आठ जिल्ह्यांतील ६१ टक्के पदवीधर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावून निकालाची चुरस वाढविली आहे. २०१४ सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान झाले आहे. २०१४ मध्ये पदवीधर निवडणुकीसाठी ३९ टक्के मतदान झाले होते. यावेळी जास्त मतदान झाल्यामुळे मतमोजणी जास्त वेळ चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागच्यावेळी मतमोजणीच्या ४ फेऱ्या झाल्या होत्या. यावेळी ५६ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था केल्यामुळे कमी वेळ लागेल, असा दावा यंत्रणा करीत आहे.
जिल्हानिहाय टक्केवारी :
औरंगाबाद ६३.५
जालना ६६.५४
परभणी ६७.६४
हिंगोली ६५.५८
नांदेड ६४.७
लातूर ६६.११
उस्मानाबाद ६६.९७
बीड ६२.०८
एकूण- ६१