काँग्रेसने तत्त्वांचा त्याग करून दिलदारीने शरद पवार यांना नेता निवडावे : संयज राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:54 PM2021-03-01T12:54:30+5:302021-03-01T13:00:22+5:30
राज्य सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने, पण आमच्याकडे टेकू आणि शरद पवार आहेत
औरंगाबाद : देशात एनडीए आणि यूपीए अस्तित्वात राहिलेली नाही. देशभरात भाजपविरोधी आघाडीसाठी काँग्रेसने दिलदारी दाखवून शरद पवार यांना नेता निवडावे, प्रसंगी तत्त्वांचा त्याग करावा, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी रविवारी येथे एका मुलाखतीत व्यक्त केले. राज्य सरकारला डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहेत. मात्र, आमच्याकडे असणारे टेकू आणि शरद पवार ते पडू देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारला डळमळीत करण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहे. सरकारचे जे टेकू आहेत, खांब आहेत. त्यांच्यात दशहत निर्माण करण्याचे हातखंडे वापरून प्रयोग सुरू आहेत, परंतु जोपर्यंत आमच्यासारखे, खा.शरद पवारांसारखे, काँग्रेसमधील काही प्रमुख लोक आहेत, त्यांनी ठरविले आहे, पडेल ती किंमत देऊन महाराष्ट्रातील सरकार टिकवायचे आहे, असे ठाम मत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी रविवारी सायंकाळी एका प्रकट मुलाखतीत व्यक्त केले. जय भीम फेस्टिवल, २०२१च्या निमित्ताने जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी खा.राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी आयोजक चेतन कांबळे आदींची उपस्थिती होती.
खा.राऊत यांनी सरकार कालावधी पूर्ण करील काय, या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले, सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षातील लोक विरोधी म्हणून नव्हतेच, महिनाभरात आपण पुन्हा शपथ घेणार, असेच त्यांना वाटत होते. आता तर दीड वर्ष झाले आहे. राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांचीही आपल्या विचाराचे सरकार राज्यात यावे, यासाठी तडफड सुरू आहे. १२ आमदारांची नावे देऊन आठ महिने झाली, परंतु अजून त्यांनी मंजुरी दिली नाही, हे घटनाबाह्य आहे. अशा पांढऱ्या हत्तीप्रमाणे असलेल्या पदांची देशाला गरज नसल्याची टीकाही त्यांनी केली.
राठोड यांच्या राजीनाम्याची गरज नव्हती
संजय राठोड यांचा वनमंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती. अद्याप तपास संपून निष्कर्ष आलेला नाही. नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये ज्या घटना घडल्या, त्यात किती जणांनी राजीनामे दिले. गुजतरामधील भाजप खा.मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली, किमान मृत्यूची चौकशी मुंबईत होईल, या हेतूने तर त्यांनी आत्महत्या केली नसावी ना, असा प्रश्न आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात तपास करतील, कारण डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये अनेक भाजप नेत्यांची नावे लिहिली आहेत.
दलितांचे नुकसान त्यांच्याच नेत्यांनी केले
दलितांचे नुकसान त्यांच्याच राजकारण्यांनी केले आहे. जे संसदेत आहेत, त्यांनीच (केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता) नुकसान केले, आजच्या राजकारण्यांनी केलेले नाही.