रासायनिक खतांच्या दरवाढीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:06 AM2021-05-09T04:06:06+5:302021-05-09T04:06:06+5:30
भराडी : सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेला शेतकरी यंदा कोरोनाच्या संकटातही मान्सूनपूर्व शेतीकामासाठी वेगाने सरसावला आहे. यातच ...
भराडी : सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेला शेतकरी यंदा कोरोनाच्या संकटातही मान्सूनपूर्व शेतीकामासाठी वेगाने सरसावला आहे. यातच खतांच्या किमतीत तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे तुणतुणे विविध खत कंपन्याकडून वाजविले जात आहे. तसे वृत्तदेखील शेतकऱ्यांपर्यंत आले. मात्र, केंद्र सरकारकडून खतांच्या किमतीत कोणतीही वाढ नसल्याचा दावा करण्यात आला. या प्रकाराने शेतकरी मात्र संभ्रमात पडलेला असून अनेक शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रात जाऊन जुन्या साठ्यातून खतांची खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.
रासायनिक खतांच्या किमतीत दरवाढ झाली तर निश्चितच ती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे ठरणार आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते; परंतु दरवर्षी शेतकरी निसर्गाच्या सुल्तानी संकटाला बळी पडतो. गेल्यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली. पुन्हा रबी पिकांत अवकाळी पावसाने नुकसान केले. आता खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकऱ्यांनी झाले गेले विसरून नव्याने शेती मशागतीस सुरुवात केली; पंरतु खतांच्या किमतीत यावर्षी भरघोस दरवाढ करण्यात आल्याचे वृत्त मिळाल्याने शेतकरी जुन्या साठ्यातील कमी किमतीचे खत खरेदीसाठी गर्दी करू लागला आहेत.
खताची दरवाढ नुकसानकारक
खताची दरवाढ झाली असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. एकीकडे नैसर्गिक संकटामुळे अपेक्षित उत्पादन हाती लागत नाही. दरवर्षी खर्च अधिक अन् उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकरी कंगाल झाले आहेत. यातच खतांच्या किमतीत दरवाढ झाली तर ती आम्हा लोकांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहेत.
- विजय काळे, शेतकरी, पिरोळा.