औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 11:46 AM2021-11-24T11:46:39+5:302021-11-24T11:52:22+5:30

C-band radar to be set up in Aurangabad : प्रभाव लोकमतचा : डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत सी-बँड रडार बसविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला; मराठवाडा, खान्देशातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी, दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटीपासून पिकांचे संरक्षण होणार

C-band radar to be set up in Aurangabad; Farmers in Marathwada will get accurate weather forecast | औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद : हवामानाचा अचूक अंदाज मिळविण्यासाठी औरंगाबादेत सी-बँड रडार डॉप्लर बसविण्यास (C-band radar to be set up in Aurangabad) केंद्र सरकारच्या पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाने परवानगी दिली आहे ( Farmers in Marathwada will get accurate weather forecast ). मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात हा मैलाचा दगड ठरणार आहे. लोकमतने विशेष मालिकेतून हा विषय लावून धरला होता. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat Karad ) यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर ( Prakash Jawadekar ) यांच्याकडे यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्यालाही यश आले आहे.

केंद्रीय पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एस. रविचंद्रन यांनी औरंगाबादेत सी-बँड डॉपलर रडारला मान्यता दिली असल्याचे पत्र नुकतेच दिले आहे. भारतीय हवामान खाते आणि विज्ञान मंत्रालय यांच्या माध्यमातून सी-बँड रडार बसविण्यात येणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासंदर्भात अत्यंत महत्त्वाची भूमिका सी-बँड डॉपलर रडार बजावणार आहे. किमान तीनशे ते चारशे किलोमीटरचा परीघ या रडारच्या नियंत्रणात येणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. रडार कार्यान्वित होताच शेतकऱ्यांना हवामान बदलासंदर्भात अचूक माहिती मिळणार आहे.

औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद हे जिल्हे पर्यावरणीय बदल, हवामान आणि तापमानवाढ या संदर्भात संवेदनशील असल्याचे ‘टेरी’च्या (द एनर्जी ॲण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट) अहवालामध्ये नमूद केले आहे. सातत्याने हवामान तसेच वातावरणातील बदलाचा फटका बसून मराठवाड्यामध्ये कृषी क्षेत्रासमोर मोठे संकट दशकभरापासून निर्माण झाले आहे. कधी दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी प्रचंड हैराण झाला आहे. दशकभरात नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यामागे हवामानातील बदल आणि आर्थिक नैराश्य ही प्रमुख कारणे असल्याचे अनेक अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. मराठवाड्यात सातत्याने पडणारा दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. केंद्र आणि राज्य सरकारने १० वर्षांमध्ये किमान १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या अनुदानावर खर्च केले आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये औरंगाबाद येथील सी-बँड डॉपलर रडार फायदेशीर राहणार आहे.

केंद्र सरकार आणि लोकमतचे अभिनंदन
मराठवाड्यासाठी ही उपयुक्त यंत्रणा आहे. अर्थात, या यंत्राद्वारे दुष्काळ निर्मूलन होणार नाही, पण संभाव्य परिस्थितीची पूर्वकल्पना यातून मिळेल. या यंत्रणेने हवामानाचा जसा अंदाज वर्तविला, त्यानुसार शेतकऱ्यांना पेरणी मागे-पुढे करता येईल किंवा पिकांच्या कापणीच्या वेळापत्रकात बदलही करता येईल. सध्या आठ जिल्ह्यांसाठी ही यंत्रणा एकाच ठिकाणी आहे, पण भविष्यात ती अधिक मायक्रो लेव्हलवर न्यावी लागेल. जालना जिल्ह्यात यंदा १० किलोमीटरच्या परिघात तीन प्रकारचा पाऊस पडला. अल्प, मध्यम आणि मुसळधार. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज येऊ शकेल, अशी यंत्रणा असावी. या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आणि विषय लावून धरल्याबद्दल तुमचेही अभिनंदन.
- विजयअण्णा बोराडे, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ.

यंत्रणा २४ तास चालावी
सर्व शेतकऱ्यांसाठी आणि नियोजनकर्त्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. या यंत्रणेची मराठवाड्याला खूप गरज होती. ती कार्यान्वित झाल्यास अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळामुळे होणारे नुकसान टाळता येईल. ‘क्लाऊड मॉनिटरिंग’ करता येईल. यातून वीज कुठे पडण्याची शक्यता आहे, पावसाचे प्रमाण नजीकच्या भविष्यात किती आहे हे लक्षात येईल आणि ढगफुटीची शक्यता असेल तर तिचा परीघ किती असेल, याचाही अंदाज येईल. या यंत्रणेचा परीघ २५० ते ३०० किमी असल्यामुळे मराठवाड्यासह खान्देश, अहमदनगर, नाशिक, विदर्भातील काही जिल्ह्यांनाही याचा फायदा होईल. ही यंत्रणा सरकारने २४ तास अविरत (अगदी शनिवार, रविवार किंवा सुटीच्या दिवशीही) सुरू ठेवावी आणि ती या विषयाच्या अभ्यासकांनाही उपलब्ध करून द्यावी.
- श्रीनिवास औंधकर, हवामान शास्त्रज्ञ, एमजीएम विज्ञान केंद्र.

Web Title: C-band radar to be set up in Aurangabad; Farmers in Marathwada will get accurate weather forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.