पाकिस्तानी सैनिकांचा सीमेलगत

By | Published: December 6, 2020 04:05 AM2020-12-06T04:05:03+5:302020-12-06T04:05:03+5:30

पाकिस्तानी सैनिकांचा सीमेलगत भारतीय चौक्या, गावात गोळीबार भारतीय जवानांनी तडाखेबाज उत्तर देत केला पलटवार जम्मू : पाकिस्तानच्या कारवाया चालूच ...

Border of Pakistani troops | पाकिस्तानी सैनिकांचा सीमेलगत

पाकिस्तानी सैनिकांचा सीमेलगत

googlenewsNext

पाकिस्तानी सैनिकांचा सीमेलगत

भारतीय चौक्या, गावात गोळीबार

भारतीय जवानांनी तडाखेबाज उत्तर देत केला पलटवार

जम्मू : पाकिस्तानच्या कारवाया चालूच असून शनिवारी पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रबंदी झुगारत पूंछ आणि कठुआतील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या चौक्या आणि गावांवर गोळीबारासोबत उखळी तोफांनी तोफगोळ्यांचा भडिमार केला.

सीमेवर सजग असलेल्या भारतीय जवानांनी वेळीच पलटवार करून पाकिस्तानने सीमापार केलेल्या गोळीबाराला आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याला चोख उत्तर दिले.

शनिवारी सकाळी ११.४० वाजता पाकिस्तानने बालकोटस्थित नियंत्रण रेषेलगतच्या बालकोटमधील नागरी वस्त्या आणि सीमा चौक्यांवर गोळीबारपाठोपाठ तोफगोळे डागण्यास सुरुवात केली, असे भारतीय संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.

त्यानंतर दुपारी ४ वाजता कस्बा आणि किर्नी भागातही सीमा चौक्यांवर तोफगोळे डागले. भारतीय जवानांनी लागलीच पाकिस्तानच्या या कुरापतीला तडाखेबाज उत्तर देत पलटवार केला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या हिरानगर भागातील चौक्या आणि गावांवर गोळीबार केला. शुक्रवारी रात्री ९.५० वाजता पन्सार सीमा चौकी भागातही पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार सुरू करण्यात आला. सीमा सुरक्षा दलानेही त्वरित पलटवार करून बदला घेतला. पहाटे ३.३५ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी सीमेवर धुमश्चक्री चालू होती. पाकिस्तानी सैनिकांनी गुरनाम आणि करोल कृष्ण सीमा चौकी भागात काही मिनिटे गोळीबार केला.

...........

एक कोटीचे सोने जप्त, दोघांना अटक

पाटणा : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआयआय) रेल्वेगाडीतून दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचे १९९१.९१ ग्रॅम सोने जप्त केले. पाटलीपुत्र रेल्वेस्टेनशवर ही कारवाई करण्यात आली. या दोघांकडे सोन्याशी संबंधित कोणतीही अवैध कागदपत्रे नव्हती. त्यांनी हे सोने म्यानमारमधून तस्करीमार्गे भारतात आणले. याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

झारखंडमध्ये १२ सायबर गुन्हेगार जेरबंद

देवघर : झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील एका गावातून पोलिसांनी १२ सायबर गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून २४ एटीएम कार्ड, सीमकार्ड, मोबाईल जप्त करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. ते बँक अधिकारी असल्याचे सांगून लोकांकडून ओळखीबाबतची माहिती अद्ययावत करण्यासाठी आणि बंद एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी परवलीचा शब्द (ओटीपी) मागून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढायचे, असे पोलिसांनी सांगितले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चार जणांना अटक

कोलकता : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पीडित मुलगी मित्रासोबत शुक्रवारी रात्री फिरत असताना चार लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि मुलीला दूरच्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. मुलीची आरडाओरड ऐकून पोलिसांचे गस्ती पथक मदतीला धावले. घटनास्थळाहून त्यांनी एका आरोपीला अटक केली, नंतर अन्य तिघांना जेरबंद करण्यात आले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

राजस्थानात पंचायत निवडणुकीसाठी ६२ टक्के मतदान

जयपूर : राजस्थानात शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य निवडणुकीच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्यात ६२.१६ टक्के मतदान झाले. २१ जिल्ह्यातील ४६ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ९०८ सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ३६ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

राजस्थानात आढळला वाघ, अभयारण्यात सतर्कतेचा इशारा

जयपूर : मानेभोवती तारेचा फास असलेला वाघ आढळल्याने राजस्थानच्या वन विभागाने राज्यातील सर्व वनक्षेत्र, अभयारण्य आणि उद्यानासाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या पावलांचे ठसे आढळले आहेत. त्यामुळे सर्व वन अधिकाऱ्यांना शोधमोहिम घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शिकारी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यास सांगण्यात आले आहे.

आयएमए प्रकरणात माजी मंत्र्याला जामीन

बंगळुरू : कोट्यवधीच्या आयएमए गुंतवणूक घोटाळ्यात कर्नाटकचे माजी मंत्री रोशन बेग यांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सीबीआयने २२ नोव्हेंबर रोजी अटक करून दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरावर धाड टाकली होती. कोर्टाने त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याच्या वकिलाने त्यांची प्रकृतीची स्थिती स्पष्ट करीत या प्रकरणात आयएमए कंपनी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सीईओ वगळता इतर सर्व आरोपींना जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.

झारखंड विधानसभेच्या माजी उपाध्यक्षांचे निधन

डेहराडून : झारखंड विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते अनुसूया प्रसाद मैखुरी (५९) यांचे शनिवारी येथील खासगी इस्पितळात निधन झाले. महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार चालू होते. कोरोनाच्या संसर्गानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांचे निधन झाले. २०१२ ते २०१७ पर्यंत ते विधानसभेचे उपाध्यक्ष होते. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रीतम सिंह यांनी शोक व्यक्त करून त्यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे, असे म्हटले आहे.

मय्यम महिला कृती दल स्थापणार - कमल हसन

चेन्नई : मक्कल नीधी मय्यम (एमएनएम) पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी शनिवारी मय्यम महिला कृती दल स्थापन करण्याची घोषणा केली. समानतेने महिलांना विविध कार्यांत अधिक संधी देणे आणि पक्षात अग्रणी भूमिका देणे, हा यामागचा उद्देश आहे. यामुळे महिला पदाधिकारी आणि पक्ष कार्यकर्त्यांचे कुटुंबही पक्षाशी जोडले जातील, असे कमल हसन यांनी सांगितले.

..........

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून सरकारला घेरले

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या दरवाढीवरून मोदी सरकारवर जोरदार टीका होत असून, सध्या आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांनीही डिझेलच्या दरात कपात करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसने सरकारला या मुद्यावरून घेरले असून, मार्च २०२० नंतर करण्यात आलेली सर्व दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात रोज होत असलेली वाढ थांबवा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, मोदी सरकार व्यापाऱ्यांप्रमाणे पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून नफा कमावत आहे. सरकारने आतापर्यंत १९,००,००० कोटी रुपयाचा अबकारी कर वाढविला आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट होत असताना भारतात किमती वाढविण्यात येत आहेत. काँग्रेसने उपस्थित केलेले मुद्दे शेतकरी आंदोलनातही उठविण्यात आले आहेत.

...................

जामीन मिळूनही कारकुनी चुकीमुळे तीन महिने तुरुंगवास

अहमदाबाद : जामीन मिळाल्यानंतरही कारकुनाच्या चुकीमुळे एका व्यक्तीला तीन महिन्याचा वाढीव तुरुंगवास भोगावा लागल्याची घटना अहमदाबाद येथे घडली आहे.

भरतसिंह सोलंकी (३७), असे या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे. त्याला अहमदाबादच्या एका स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतरही त्याला तीन महिने तुरुंगात काढावे लागले. तीन महिन्यानंतर सत्र न्यायालयाने चूक दुरुस्त केली तेव्हा, १५ हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याची तुरुंगातून सुटका झाली.

तारणासह भाडोत्री कारशी संबंधित रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून सोलंकी आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना जूनमध्ये अटक झाली होती. भाडे करार संपल्यानंतरही कार परत केली नाही, म्हणून एक ट्रॅव्हल एजन्सी आणि कार मालक यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. हे वाहन आरोपींनी इतरांना भाड्याने दिले होते. प्रकरणाच्या तपासातून एका रॅकेटचा भंडाफोड झाला. एफआयआर नोंदवला नाही म्हणून एका पोलीस निरीक्षकास निलंबितही करण्यात आले होते.

१० ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयाने सोलंकी आणि गोहील नावाचा दुसरा आरोपी यांना जामीन दिला. तथापि, कारकुनाने आदेश टाईप करताना चुकून सोलंकीचे नावच टाकले नाही. त्यामुळे त्याची सुटका लटकली. नंतर सोलंकीने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३६२ अन्वये नवा अर्ज न्यायालयात सादर करून कारकुनी चूक दुरुस्त करण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने चूक दुरुस्तीचे आदेश देऊन सोलंकी याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला.

........................

Web Title: Border of Pakistani troops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.