चार महिन्यांत ६ लाख ७७ हजार नागरिक औरंगाबादमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:06 PM2020-07-02T13:06:41+5:302020-07-02T13:07:22+5:30
महाराष्ट्र शासनाने जिल्हाबंदी अद्याप उठविलेली नाही. असे असतानाही शहरात वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही.
औरंगाबाद : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरात बाहेरील नागरिक येण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. मागील चार महिन्यांत ६ लाख ७७ हजार नागरिक शहरात दाखल झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने जिल्हाबंदी अद्याप उठविलेली नाही. असे असतानाही शहरात वेगवेगळ्या जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. मुंबई, पुणे, नाशिक आणि इतर मोठ्या शहरांमधून नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत. असंख्य नागरिक पोलिसांची परवानगी घेऊन येत आहेत तर काही जण विनापरवाना येत आहेत. हर्सूल, जालना रोड, मुंबई रोड येथे मागील चार महिन्यांपासून २४ तास शहरात येणाऱ्या नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात येत आहे. दररोज पाच हजारांहून जास्त नागरिक शहरात दाखल होत आहेत. शहराच्या आसपासच्या गावांमधील नागरिक साहित्य खरेदीसाठी शहराच्या बाजारपेठेत येतात. त्यामुळे संख्या वाढल्याचे मनापाने सांगितले.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे
लॉकडाऊनला शंभर दिवस पूर्ण होत आले. मागील चार महिन्यांपासून कोरोना योद्धे आणि नागरिकांच्या मदतीने काम सुरू आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे. या सर्व परिस्थितीवर महापालिका नजर ठेवून आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करणे खूप आवश्यक आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सचा अवलंब करावा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत, घराबाहेर कमीत कमी पडावे.
-आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका प्रशासक