टोळधाडीने नुकसान भरपाईसाठी झेडपीत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:01:33+5:30
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल घरात पडून आहे. त्यात आता टोळधाडीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. मोर्शी व वरूड तालुक्यातील या शेतकऱ्यांना टोळधाडीचा फटका बसला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनासोबतच टोळधाडीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. टोळधाडीमुळे होणाºया नुकसानाची भरपाई शासनाने द्यावी, अशा आशयाचा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. सदर मुद्दा सदस्य राजेंद्र बहुरूपी यांनी सभेत मांडला होता. हा ठराव आता शासनाकडे पाठविला जाणार आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल घरात पडून आहे. त्यात आता टोळधाडीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. मोर्शी व वरूड तालुक्यातील या शेतकऱ्यांना टोळधाडीचा फटका बसला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी २९ मे रोजी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्य राजेंद्र बहुरूपी यांनी केली होती. यादरम्यान जिल्हा परिषदेकडे पुरेसा निधी नसल्याने शासनाकडून त्याची तरतूद करावी, अशा सूचना अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिल्या.
दरम्यान, आमसभेत बहुरूपी यांच्या मुद्द्याच्या अनुषंगाने टोळधाडीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी शासनाकडे या ठरावाद्वारे केली आहे.
पशुधन विमा, विद्यार्थ्यांना सॅनिटायझर पुरवा
तीन महिन्यांत जिल्ह्यात जनावरे चोरी होण्याच्या एकूण १२ घटना घडल्या आहेत. त्यामुळे पशुधनाचा खासगी विमा काढावा. आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरातील १ हजार ६०० शाळांतील १ लाख १० हजारांवर विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सॅनिटायझर, मास्क व हँडग्लोव्ह्ज उपलब्ध करून द्यावे तसेच पशुसंवर्धन विभागाकडून सुमार दर्जाचा औषध पुरवठा त्वरित बंद करून चांगल्या दर्जाचे औषधे उपलब्ध करून देण्यात यावे आदी मुद्दे सदस्य प्रकाश साबळे यांनी मांडले. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पशुधनाच्या विम्याकरिता ठराव करून तो शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सभागृहात सांगितले. विद्यार्थ्यांना शाळेत सॅनिटायझर, मास्क, हॅँडग्लोव्ह्ज पुरवठ्याकरिता निधी देण्याबाबतचा ठराव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात येणार आहे.