पावसाने सोयाबीनला फुटले कोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:32+5:30
तालुक्यात २५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीनचा पेरा आहे. सुरुवातीला पेरणीपासून वेळोवेळी चांगला पाऊस आल्याने यंदा पीक चांगले होईल, अशी आशा होती. परंतु, पीक कापणीवेळी पावसाने चांगलाच जोर धरल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेले उडीद, मुंग, तीळ हे पीक हातचे गेले. शेतकऱ्यांची आस सोयाबीनवर होती. परंतु १५ दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे वाळलेल्या सोयाबीनच्या शेंगांमधून आता कोंब फुटायला लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : यंदा खरिपाला पोषक वातावरण मिळाल्याने चांगले उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, ऐन पीक कापणीच्या वेळी सलग पावसाने विविध रोगांसह कोंब फुटू लागल्याने पुन्हा निराशाच हाती आली आहे. अतिपावसाने उडीद, मूग या पिकांबरोबर सोयाबीनही शेतकऱ्यांच्या हातून निसटण्याची चिन्हे आहेत.
तालुक्यात २५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात सोयाबीनचा पेरा आहे. सुरुवातीला पेरणीपासून वेळोवेळी चांगला पाऊस आल्याने यंदा पीक चांगले होईल, अशी आशा होती. परंतु, पीक कापणीवेळी पावसाने चांगलाच जोर धरल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेले उडीद, मुंग, तीळ हे पीक हातचे गेले. शेतकऱ्यांची आस सोयाबीनवर होती. परंतु १५ दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे वाळलेल्या सोयाबीनच्या शेंगांमधून आता कोंब फुटायला लागले आहेत. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घासदेखील या पावसाने हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनच्या हिरव्या दाण्यातूनच आता कोंब बाहेर येत आहे. १५ दिवसांपूर्वी भरघोस पिकाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांची सध्या शेतात जायचीही हिंमत होत नसल्याचे अनेकांनी सांगितले.
तालुक्यात आधी खोडअळी व मोझिला व्हायरसने पिकाचे नुकसान केले. तलाठी व कृषी सहायक यांच्याकडून सर्व्हे सुरू असून ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. अहवाल शासनाकडे पाठविला आहे.
- राजेंद्र इंगळे, तहसीलदार