धामणगावात बरसल्या जलधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:01:17+5:30
पावसाचा श्रीगणेशा करणाऱ्या रोहिणी नक्षत्राला २४ मे रोजी प्रारंभ झाला. मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहिली जात असतानाच बुधवारी तालुक्यातील बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात रोहिणीचा पाऊस बरसला. विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह पाऊस कोसळला. या पावसामुळे तापमानात कमालीची घट झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : निसर्ग चक्रीवादळाने धामणगाव तालुक्यात दोन दिवसांपासून जलधारा बरसत आहेत. दरम्यान, संत्रा बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धामणगाव रेल्वे शहरात व तालुक्यात बुधवारी दुपारी १ वाजतापासून पावसाने हजेरी लावली. हा पाऊस १० ते १५ मिनिटे कोसळला. या पहिल्या पावसाचा आनंदोत्सव कोरोनाच्या काळातही धामणगाववासीयांनी साजरा केला.
पावसाचा श्रीगणेशा करणाऱ्या रोहिणी नक्षत्राला २४ मे रोजी प्रारंभ झाला. मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहिली जात असतानाच बुधवारी तालुक्यातील बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात रोहिणीचा पाऊस बरसला. विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह पाऊस कोसळला. या पावसामुळे तापमानात कमालीची घट झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या पेरणीपूर्व कामांनाही कमालीचा वेग आला आहे.
यंदाच्या पावसाळ्यातील मृग नक्षत्राला ७ जूनपासून सुरुवात होत आहे. या मृग नक्षत्राचे वाहन म्हैस आहे. या वाहनावर स्वार होऊन पाऊस धो-धो कोसळतो, असा ग्रामीण भागात समज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदरच पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत.
यावर्षी थकबाकीदार शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळाले नाही. परिणामी पेरणीशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहार थांबले आहेत. आता शासनाने त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याची घोषणा केली असली तरी पीककर्जाची रक्कम अद्याप सदर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांची बियाणे खरेदी थांबली आहे.