अचलपूर-परतवाड्यात नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:09+5:30

केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच्या घरात गेली. यात ३२.५ दलघमी क्षमतचे जलशुद्धीकरण केंद्र देवगाव येथे उभारले गेले.

Planning collapsed in Achalpur-Paratwada | अचलपूर-परतवाड्यात नियोजन कोलमडले

अचलपूर-परतवाड्यात नियोजन कोलमडले

googlenewsNext
ठळक मुद्देअमृत योजनेत घोळ; पाणीपुरवठ्यावर खर्ची घातलेले शंभर कोटींहून अधिक ठरले व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रात पाण्याच्या नियोजनासह वितरण व्यवस्था कोलमडली आहे. त्यात अमृत योजनेतील घोळाने अधिक भर पडली आहे. शहरवासीयांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. पाणी असूनही नागरिकांना मिळत नसल्यामुळे दहा वर्षांत पाणीपुरवठा योजनेच्या नावे खर्ची पडलेली शंभर कोटींहून अधिकची रक्कम व्यर्थ ठरली आहे.
केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच्या घरात गेली. यात ३२.५ दलघमी क्षमतचे जलशुद्धीकरण केंद्र देवगाव येथे उभारले गेले. तेथून २२ किलोमीटर लांबीची शुद्ध पाण्याची गुरुत्ववाहिनी (पाइप लाइन) टाकली गेली. शहरात नव्याने पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. या टाक्यांवरून ९१.४ किमी लांबीची नवीन वितरण व्यवस्था अंथरली गेली. २५ किमी लांबीची जुनी पाइप लाइन बदलविली गेली. पण, नागरिकांना अपेक्षेनुसार पाणी उपलब्ध करून देण्यास योजना सक्षम ठरली नाही.
दरम्यान, दहा वर्षांच्या आतच नवीन पाइप लाइन टाकली गेली. शहराच्या अनुषंगाने कार्यालयात उपलब्ध रेखाटने आणि प्रत्यक्ष पाइप लाइन याचा कुठे मेळच बसत नाही. या पाइप लाइनचे जॉइंट जोडले गेले नाहीत. काही भागात दुहेरी पाइप लाइन आली आहे. दोन्ही पाइपवर नळ कनेक्शन दिले गेले. मात्र, मीटर बसविले गेले नाहीत.
अमृत योजनेतील पाइप लाइनवर मोठे लीकेज आहेत. शहरात रस्त्याच्या एका बाजूला पाणी, तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी ओरड असल्याची स्थिती शहरात दिसत आहे.

२० कोटी थकीत
अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील नळधारकांकडे पिण्याच्या पाण्याचे २० कोटी थकीत आहेत. यात साडेपंधरा कोटी अचलपूर शहरातील, तर साडेचार कोटी परतवाडा शहरातील नळधारकांकडे थकबाकी आहे. व्याजानुसार ही रक्कम दरवर्षी वाढत असून, थकीतदारांचा पाणीपुरवठा आजही सुरू आहे.

नळधारकांकडे २० कोटी थकीत आहेत. व्याजमाफीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. अमृत योजनेतील पाइप जोडले गेलेली नाहीत.
- मिलिंद वानखडे
अभियंता, पाणी पुरवठा न.प. अचलपूर

चौकशीची मागणी
अमृत योजनेतील पाइप लाइनची चौकशी करण्याची मागणी काही नगरसेवकांसह नागरिकांनी केली आहे. संबंधित ठेकेदार काम सोडून गेल्याची महिती आहे. काम अपूर्ण असतानाही काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची लगबग सध्या सुरू आहे. चंद्रभागा धरणावरील पाणीपुरवठा योजनेचे आॅटोमायझेशन प्रस्तावित होते. ते दहा वर्षांपासून झालेले नाही.

Web Title: Planning collapsed in Achalpur-Paratwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.