ब्रिटिश राजवटीतील तलाव आजही उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:12+5:30
१८ तलावांपैकी काही तलाव गावाच्या अगदी नजीक असल्याने गावालाही पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे त्या तलावाचा गाळ उपसल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची पातळी नक्कीच वाढेल. याचा फायदा तलावाशेजारच्या गावांना होईल. या तलावाची योग्य निगा राखणे गरजेचे आहे.
अमोल कोहळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा बंदी : वन्यप्राण्यांच्या झुंडीला पाच-पाच किलोमीटर चालून गेल्यानंतर पाण्याची आवश्यकता भासते. त्याचे नियोजन वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलाच्या आतील गाभाऱ्यात करण्यात आले आहे. या भागातील सुमारे १८ ब्रिटिशकालीन तलाव आजही वन्यप्राणी व गावकऱ्यांची तहान भागवित आहे. वन्यप्राणी, पक्षी, वृक्षांच्या पिढ्या या तलावाने आबाद झाल्यात.
वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलात असलेल्या रत्नापूर तलाव, भिवापूर तलाव, माळेगाव तलाव, पोहरा तलाव, सावंगा तलाव, वासलापूर तलाव, भवानी तलाव, बग्गी तलाव, इंदला तलाव, घातखेडा तलाव, शेवती तलाव, कारला तलाव, मार्डी तलाव, तपोवनेश्वर तलाव, छत्री तलाव, वडाळी तलाव, मालखेड तलाव, कोंडेश्वर तलावापैकी काही नजीकच्या गावांच्या नावाने, तर काही विशिष्ट खुणांमुळे नावारूपास आले. काही नैसर्गिक तलावांचे संवर्धन करताना ब्रिटिशांनी प्राकृतिक रचना कायम ठेवली. या १८ तलावांपैकी छत्री तलाव, वडाळी तलाव, मालखेड तलाव, कोंडेश्वर तलाव हे पिकनिक स्पॉट झाले आहेत. काही तलावांवर मासेमारांची वर्दळ असते. जंगलाच्या मध्यभागाच्या गाभाºयात असलेल्या १४ तलावांवर हजारोंच्या संख्येने वन्यप्राणी तहान भागवितात. यापैकी काही तलावांचा पाणीसाठा २० ते २३ टक्क्यांवर आला आहे.
तलावानजीक असलेल्या डेरेदार वृक्षांना जगविण्याचे श्रेयदेखील या तलावांनाच जाते. येथील वृक्षवेलींच्या अनेक प्रजाती आहेत.
१८ तलावांपैकी काही तलाव गावाच्या अगदी नजीक असल्याने गावालाही पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे त्या तलावाचा गाळ उपसल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची पातळी नक्कीच वाढेल. याचा फायदा तलावाशेजारच्या गावांना होईल. या तलावाची योग्य निगा राखणे गरजेचे आहे.