कोरोना संक्रमणमुक्त दोन हजारांच्या उंबऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:57+5:30
जिल्ह्यात हाथीपुरा भागातील नागरिकाच्या मृत्यूपश्चात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला पहिला संक्रमित व पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ११८ दिवसांत जिल्ह्यात ३१३५ संक्रमित अन् ८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याच कालावधीत १९८५ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात येऊन घरी सोडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात आतापर्यंत ३१३५ कोरोना संक्रमितांची नोंद झालेली असली तरी त्यापैकी १९८५ रुग्णांना उपचारानंतर संक्रमणमुक्त करण्यात आल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. संक्रमणमुक्त झालेल्यांचे प्रमाण एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत ६४ टक्के आहे. यात सातत्याने वाढ होत आहे.
जिल्ह्यात हाथीपुरा भागातील नागरिकाच्या मृत्यूपश्चात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला पहिला संक्रमित व पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ११८ दिवसांत जिल्ह्यात ३१३५ संक्रमित अन् ८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याच कालावधीत १९८५ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात येऊन घरी सोडण्यात आले. या नागरिकांना पुढील किमान सात दिवस गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. या आशयाचे हमीपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांद्वारे कोरोनामुक्त झालेल्यांकडून घेतले जाते.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे ८० टक्के रुग्ण हे लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणांची असल्यामुळे त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था आदी ठिकाणी ठेवण्यात येत आहे. याशिवाय क्रिटीकल असलेल्या रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आता तिवसा, वलगाव आदी ठिकाणी उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणाद्वारे देण्यात आली. आयसीएमआर व आरोग्य विभागाने दिलेल्या नव्या गाईडलाईननुसार रुग्णांवर उपचार होत आहेत. यामध्ये पाच दिवस उपचार व पाच दिवस निरीक्षणानंतर डिस्चार्ज देण्यात येत आहे.
रुग्णांचा सकारात्मक दृष्टिकोन, पोलीस व आरोग्य यंत्रणांचे सहकार्य यामुळे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाकाळात दिलासा देणारी ही बाजू ठरली आहे.
- प्रशांत रोडे
आयुक्त महापालिका