श्रमिक रेल्वेने उत्तर प्रदेशचे १५४४ मजूर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:01:22+5:30
श्रमिक एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यात अमरावती विभागातील १५४४ मजूर, कामगार बांधव रवाना झाले आहेत. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष ठाकरे, अमरावतीचे स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या उत्तर प्रदेशातील १५४४ मजूर, कामगार बांधवांना स्वगृही पोहचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्स्प्रेस बुधवारी सायंकाळी ६ वाजता अमरावती रेल्वे स्थानकाहून उत्तर प्रदेशच्या देवरियाकडे रवाना झालेत. अमरावती विभागात अडकलेल्या मजूर, कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा देवरियापर्यंत जाणार आहे.
श्रमिक एक्स्प्रेस २४ डब्यांची असून, त्यात अमरावती विभागातील १५४४ मजूर, कामगार बांधव रवाना झाले आहेत. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष ठाकरे, अमरावतीचे स्टेशन प्रबंधक महेंद्र लोहकरे, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. रेल्वे स्थानकावर प्रथमत: सर्व परप्रांतीय प्रवाशांंची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या भोजन, चहा, पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली. विभागातून ठिकठिकाणाहून आलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर घरी परतण्याचा आनंद झळकत होता. जिल्हाधिकारी शैलेश नवाल व अन्य अधिकाऱ्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांना फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर आदींबाबत आवाहन केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
श्रमिक ट्रेनमधून अमरावती जिल्ह्यातून ५००, अकोला २८०, यवतमाळ २२१, बुलडाणा ४४२ आणि वाशिम जिल्ह्यातील १०१ कामगार रवाना झाले आहेत. केंद्र सरकारने प्रतिव्यक्ती ६५० रुपये प्रवास भाडे रेल्वेला दिले असून, बुधवारी रवाना झालेल्या विशेष ट्रेनद्वारे १० लाख ३ हजार ६०० रूपये रेल्वेला उत्पन्न मिळाले आहे.
संचारबंदीमुळे अनेक दिवसांपासून अडकून पडल्यामुळे कामगारांचा कुटुंबीयांशी केवळ मोबाइलद्वारे संपर्क होत होता. मात्र, शासनाने दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली. त्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबीयांना, नातेवाइकांना अनेक दिवसांनी प्रत्यक्ष भेटता येणार आहे. घरी परतण्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी परप्रांतीय मजूर, कामगारांनी व्यक्त केली. दरम्यान गत आठवडाभरापासून पश्चिम बंगालकडे जाणाºया कामगारांसाठी रेल्वे उपलब्ध झाली नाही.