वन्य प्राण्यांची नागरी वस्तीकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:19 AM2021-05-14T04:19:01+5:302021-05-14T04:19:01+5:30

माझोड-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था! माझोड : माझोड-वाडेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम सुरू करण्याची ...

Wild animals run to urban areas! | वन्य प्राण्यांची नागरी वस्तीकडे धाव!

वन्य प्राण्यांची नागरी वस्तीकडे धाव!

Next

माझोड-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था!

माझोड : माझोड-वाडेगाव रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी पांडुरंग बंड, विनोद ताले, देवानंद खंडारे, राजेश ठाकरे, प्रकाश पाटील, रणजीत खंडारे, राजेश ताले, प्रमोद खंडारे, नितेश बराटे, महेश ढोरे, श्रीकृष्ण खंडारे, अमोल काळे, शिवलाल ताले, विपुल खंडारे आदींनी केली आहे.

ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक

बार्शिटाकळी : गेल्या पंधरवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सुरुवातीला शहरी भागात रुग्ण आढळून येत होते. आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी प्राप्त अहवालानुसार तालुक्यातील वरखेड येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

खाद्यतेलाचे दर आवाक्याबाहेर

मूर्तिजापूर : कोरोना संकटात अर्थव्यवस्था ढासळत असताना महागाई मात्र वरचढ होत आहे. एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही. शासनाकडून योजनेचे पैसे मिळत नाहीत. अशा अवस्थेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मात्र गगनाला भिडलेल्या आहेत. सोयाबीन तेलाचे दर प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

बाभूळगाव-माझोड रस्त्यावर खड्डे

पातूर : तालुक्यातील बाभूळगाव-तांदळी-माझोड रस्त्यावर डांबरीकरण झाल्यापासून रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. या मार्गाने प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

अकोट : शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आले असले तरी, ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.

नवथळ येथील प्रवासी निवारा शोभेचा

आगर : उगवा-आगर मार्गावर असलेला नवथळ येथील प्रवासी निवारा सध्या शोभेची वास्तू बनलेला आहे. बऱ्याच गाड्यांचा थांबा असल्यामुळे नवथळ, पाळोदी येथील प्रवाशांना प्रवासी निवाऱ्याबाहेर उभे राहून गैरसोयीचा सामना करावा लागतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वनविभागाच्या निवासाची दुरवस्था

पातूर : वन कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून निवासस्थान तयार केले. नियोजनाअभावी या निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील पांढुर्णा परिसरात असलेले निवासस्थान भुईसपाट झाले आहे.

गावागावांत वाहतोय हातभट्टीचा महापूर

बार्शिटाकळी : कोरोना संचारबंदीमुळे मान्यताप्राप्त दारू दुकाने बंद आहेत. परिणामी मद्यपी हातभट्टीच्या दारूकडे वळले आहेत. गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळली जात असून, प्रत्येक गावात ही दारू सहज उपलब्ध होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बाळापूर तालुक्यात रेती तस्करी जोमात

बाळापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत बाळापूर तालुक्यातील लिलाव न झालेल्या घाटांवर सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

दिव्यांगांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष

पातूर : कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. संक्रमण टाळता यावे, म्हणून प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे, पण या अभियानात दिव्यांगांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या अभियानात दिव्यांगांसाठी कोणताही विशेष दिवस नाही. विशेष व्यवस्था दिसून येत नाही. प्रशासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास विलंब!

वाडेगाव : शेतकऱ्यांनी ३१ मार्च अगोदर नियमित कृषी कर्जाचा भरणा केला आहे. या कर्जावर व्याज लागू नये, म्हणून इकडून तिकडून पैसे गोळा करून हे कर्ज अनेक शेतकऱ्यांनी फेडले; मात्र बँकेत सातबारा देऊनही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

इसापूर येथे लोकसहभागातून नदीचे खोलीकरण

वाडी अदमपूर : तेल्हारा तालुक्यातील इसापूर येथील ग्रामपंचायत व लोकसहभागातून नागझरी नदीचे खोलीकरण करून गाळ काढण्यात येत आहे. ग्रामपंचायतमार्फत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

सस्तीनजीक पुलाची दुरवस्था

खेट्री : चान्नी-वाडेगाव मार्गावरील सस्तीजवळील वघाडी नाल्यावरील पुलाची गेल्या काही महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांत वाढ होत असून, अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

चिखलगाव येथील रस्त्याचे काम निकृष्ट

चिखलगाव : येथील ग्रामपंचायतीमार्फत रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु कंत्राटदारामार्फत रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने, ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. रस्त्याच्या कामाकडे सरपंचांचे दुर्लक्ष होत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मूर्तिजापुरातील आठवडी बाजार बंद

मूर्तिजापूर : दर आठवड्याला भरणारे शुक्रवार आणि मंगळवार हे आठवडे बाजार संचारबंदी काळात बंद ठेवण्यात आले आहेत. बाजाराच्या दिवशी व्यापारी व शेतकऱ्यांनी बाजारात भाजीपाला माल घेऊन येऊ नये, असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी केले आहे.

पोपटखेड येथे कोरोना लसीकरणाबाबत उदासीनता

पोपटखेड : अकोट तालुक्यातील आदिवासीबहुल पोपटखेड गावात गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. परंतु त्याचा आर्थिक कारभार अद्यापपर्यंत मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुरू आहे. त्यामुळे स्थानिक आरोग्य समितीला नियोजन करताना अडचण भासत आहे. तसेच कोरोना लसीकरणाबाबतही गावात उदासीनता दिसून येत आहे.

सांगळूद-घुसर मार्गावर वाढली झुडपे

म्हातोडी : सांगळूद-घुसर मार्गावर वृक्षांच्या फांद्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर तुटून पडतात. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्त्याकडेची झुडपे कापण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

शेतीकामासाठी मजुरांची वानवा

बोरगाव मंजू : सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागात मजुरांची टंचाई भासत आहे. त्यातच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या भीतीनेही अनेक जण कामासाठी टाळाटाळ करत आहेत. तसेच मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था

बाळापूर : तालुक्यातील अनेक गावांतील स्मशानभूमीला रस्त्यांची समस्या आहे. येथील समस्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दुरवस्थेतील स्मशानभूमी जिल्हा प्रशासनाने दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.

कार्यालयांमध्ये तक्रार पेट्यांची मागणी

बाळापूर : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी वरिष्ठांकडे जाणार या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.

वाडेगाव-माझोड रस्त्याची दुरवस्था

माझोड : वाडेगाव-माझोड रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर दररोज अपघात घडतात. सर्वसामान्यांना सदर रस्ता धोकादायक ठरत असताना बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण भागात अवैध व्यवसाय जोमात

बार्शिटाकळी : तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे फोफावले आहेत. काही महिन्यांपासून या परिसरात रेती वाहतूक, जनावरांची अवैध वाहतूक, दारू, जुगार व गुटखा विक्री अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

व्याळा-टाकळी खुरेशी रस्त्याचे काम धिम्यागतीने

बाळापूर : तालुक्यातील व्याळा-टाकळी खुरेशी रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

रोहयोची कामे सुरू करण्याची मागणी

तेल्हारा : तालुक्यातील प्रत्येक गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहेे.

-

नेटवर्कअभावी मोबाइल ग्राहक त्रस्त

पिंजर : परिसरात विविध कंपन्यांसह बीएसएनएलचेसुद्धा नेटवर्क नाही. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यातच ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नेटवर्क समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Wild animals run to urban areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.